विशेष प्रतिनिधी
नागपूर / मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या फुल्ल राजकीय बॅटिंग करत आहेत. काल त्यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त दौऱ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना, “तुम्ही शाहूपुरीत थांबा. आम्ही तिथे येतोय भेट होईल,” असा निरोप पाठवून त्यांची भेट घेतली. दोघांनी एकमेकांचे क्षेम कुशल पुसले. काही वेळ बातचीत केली आणि दोघेही आपल्या नियोजित दौऱ्यावर निघून गेले.CM uddhav Thackeray praise nitin gadkari
आज त्याचा पुढचा “राजकीय सिनेमा” पाहायला मिळाला. निमित्त होते नागपूर मधले ऐका उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे. केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाले. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्यावर कौतुकाची फुले उधळली. युती सरकारच्या काळातल्या आठवणी जागवल्या. बाळासाहेब ठाकरे हयात असताना युती सरकारमध्ये नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या प्रयत्नातून आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेतून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग साकार झाला.
आता मुंबई – पुणे या दोन शहरांमधील अंतर नितीन गडकरी हे आणखी कमी करीत आहेत. याविषयीचे कौतुकोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. नितीनजी, मला तुमचा अभिमान वाटतो अशा शब्दांत त्यांनी गडकरी यांच्यावर कौतुकाची फुले उधळली.
त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे मदतीची मागणी केली. कितीही पाऊस पडला तरी रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, असे तंत्रज्ञान तुम्ही आणताय असे समजले आहे. ते तंत्रज्ञान आम्हाला म्हणजे महाराष्ट्राला द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना केली.
मुसळधार पावसाने मुंबईसह महाराष्ट्रातील या रस्त्यांची वाट लागली आहे. जनता ठाकरे – पवार सरकारला खडे बोल भररस्त्यात सुनावत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे खड्डेमुक्त रस्त्यासाठी तंत्रज्ञानाची केलेली मागणी महत्त्वाची ठरते आहे.
त्याचबरोबर काल फडणवीसांची कोल्हापुरात भेट आणि आज नितीन गडकरी यांच्यावर उधळलेली कौतुकाची फुले या महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार चालविणाऱ्या ‘उद्धव नीतीची” राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App