राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे कमांड अन् कंट्रोलची अतिशय चांगली प्रणाली उभी, असल्याचंही फडणवीस म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे (मंत्रालय नियंत्रण कक्ष) उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वातावरणातील बदलांमुळे आपत्तीच्या पद्धती बदलत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपत्ती सौम्यीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन गोष्टींवर राज्य शासन सर्वाधिक जोर देत आहे. आपत्ती निवारणासोबतच घटना घडते तेव्हा त्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करण्याचा आपला प्रयत्न असतो. या प्रयत्नांमध्ये कमांड आणि कंट्रोलची सर्वाधिक आवश्यकता असते. अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे मंत्रालयामध्ये या कमांड आणि कंट्रोलची प्रणाली अतिशय चांगल्याप्रकारे उभी राहिली आहे. तसेच आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची आपत्कालीन प्रणाली आपण उभी करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही आपत्तीमध्ये योग्य प्रकारे संपर्क साधला जात असेल, व्यवस्थापनाची कमांड योग्य असेल, तर योग्य निर्णय घेता येतील आणि जलद प्रतिसाद देता येईल. आजच नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यावर आपत्ती येऊच नये, अशी आपली इच्छा आहे. पण, तरीही आपत्ती येते. अशा परिस्थितीत आलेल्या आपत्तीमध्ये अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्र प्रभावीपणे काम करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच मंत्रालयामध्ये अद्ययावत, सुसज्जित, आधुनिक राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सुरु केल्याबद्दल संबंधित विभागाचे सचिव, मंत्री, राज्यमंत्री आणि यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मानकांनुसार हे केंद्र नव्याने उभे करण्यात आले आहे. नव्या SEOC मध्ये बेझल-फ्री व्हिडिओ वॉल, उच्च क्षमतेचे AV कॉन्फरन्सिंग, डेटा सर्व्हर, हाय-स्पीड संगणक, SATPHONES, हॅम रेडिओ, VHF/UHF वायरलेस सेट यांचा समावेश आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (SIDM):
नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (SIDM) इमारत बांधकामासाठी राज्य निधीमधून ₹184 कोटींच्या निधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही संस्था राज्यातील सर्व घटकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी आणि आपत्ती संबंधित विविध विषयावर संशोधन केंद्र म्हणून कार्य करेल.
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र:
जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत 34 जिल्ह्यांमध्ये (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता) आणि 3 महानगरपालिका (सांगली-मिरज-कुपवाड, कोल्हापूर आणि इचलकरंजी) जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांचे (DEOC) आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, संबंधित विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App