विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chagan Bhujbal नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पदावरील आपला हट्ट सोडला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामे मार्गी लागणे महत्वाचे आहे. त्यासाठी पालकमंत्रिपद हवेच असे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.Chagan Bhujbal
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत मतभेद निर्माण झालेत. सरकारने प्रारंभी या जिल्ह्याचे पालकत्व भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपवले. पण त्यामु्ळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नाराज झाली. शिवसेनेला हे पद आपले नेते दादा भुसे यांच्यासाठी हवे होते. त्यामुळे सरकारने महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सरकारमध्ये समावेश झाला. त्यानंतर हे पद भुजबळांकडे जाईल असे वाटत होते. पण आता भुजबळांनीही या शर्यतीतून अंग काढून घेतल्यामुळे हे पद गिरीश महाजन किंवा दादा भुसे या दोघांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे.
पालकमंत्रिपदासाठी माझा हट्ट नाही
छगन भुजबळ सोमवारी नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. त्यात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी पालकमंत्रिपदच हवे असे नाही. आणि पालकमंत्रिपदासाठी आपला हट्टही नाही.
उल्लेखनीय बाब म्हणजे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद हा राजकीय प्रभाव, कुंभमेळ्यासाठी मिळालेला शेकडो कोटींच्या निधीवरील नियंत्रण व महायुतीतील अंतर्गत गटबाजी याचा परिणाम आहे. भुजबळांच्या माघारीमुळे हा वाद तात्पुरता शमला असला तरी, भविष्यात या प्रकरणी नव्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाकरे गटात कोण निर्णय घेते माहिती नाही – भुजबळ
छगन भुजबळ यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील निर्णय प्रक्रियेविषयी मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केले. आमच्या काळात सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे हेच घेत होते. आता कोण घेत आहे ते माहिती नाही. सेनेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तिथे जाण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे माझा प्रवेश कुणामुळे थांबला या विधानाला महत्व नाही, असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते भरत गोगावले?
भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप केला होता. रश्मी ठाकरे पडद्यामागून शिवसेनेत कायम हस्तक्षेप करायच्या. उद्धव ठाकरे यांच्या मनात काही विचार असायचे, पण ते नंतर बदलायचे. आम्ही कार्यकर्ते व पदाधिकारी उद्धव यांना भेटण्यासाठी गेलो तर आम्हाला त्यांची भेट मिळत नव्हता. आम्हाला परत यावे लागायचे. आमदारांनाच प्रवेश नव्हता तर कार्यकर्त्यांचे काय? हे सर्वांना दिसत होते. या सर्व घडामोडींमागे रश्मी वहिनी व त्यांचे नातेवाईक होते. त्यामुळे इच्छा असूनही उद्धव यांना काहीही करता येत नव्हते. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव करण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले होते.
आम्ही स्त्री शक्तीचा आदर करतो. त्याबद्दल दुमत नाही. पण ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना काही चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, त्या न सांगितल्यामुळे हे सगळे घडले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देऊ नका असे सर्वांचे म्हणणे होते. पण त्याचाही हट्ट धरला गेला. त्यानंतर हे सर्व रामायण – महाभारत घडलं, असे भरत गोगावले म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App