नाशिक : बेकायदा खनन आणि मुरुम उपसा प्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवायला गेलेले पण त्याचवेळी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी करून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार अमोल मिटकरी अचानक नरमले कसे आणि त्यांना कोणी नरमवले??, असे सवाल अजितदादा आणि मिटकरी यांच्या नव्या नरमाईच्या पवित्र्याने समोर आले.
बेकायदा खनन आणि वाळू उपसा प्रकरणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमबाजी केली. नेहमीप्रमाणे आपला आवाज ऐकल्यानंतर अधिकारी नमतील असे अजितदादांना वाटले होते. पण अंजना कृष्णा खमक्या निघाल्या. त्या थेट अजितदादांना नडल्या. त्यांनी अजितदादांना व्हिडिओ कॉल करायला लावला. त्यामुळे अजितदादा चांगलेच बिथरले. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने सुरुवातीला आदळ आपट करून पाहिली. पण महिला आयपीएस अधिकाऱ्याला राज्याचा उपमुख्यमंत्री धमकावतो आणि दमबाजी करतो हे प्रकरण चांगलेच पेटले त्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ व्हायरल झाले. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेलेले अजितदादा अडचणीत आले.
रोहित पवार यांच्यासारख्या उपद्रवी आणि उपद्व्यापी पुतण्याने बाजू घेऊन सुद्धा अजित पवारांची बाजू सावरली गेली नाही. त्यातच अमोल मिटकरी यांनी आगाऊपणा करून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याच सर्टिफिकेटची तपासणी करावी, अशी मागणी करणारे पत्र यूपीएससीला पाठविले. यातून अख्ख्या राष्ट्रवादीची दादागिरी महाराष्ट्रासमोर उघड्यावर आली. अंजली दमानिया यांनी या प्रकाराची दखल घेऊन राष्ट्रवादीला कोर्टात खेचायची धमकी दिली.
– अजितदादांना नरमवले
पण या दरम्यानच्या काळात बऱ्याच “राजकीय कळी” फिरल्या. “राजकीय नसा” दाबल्या गेल्या. तुम्ही भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलाय. काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला नाही, याची जाणीव अजितदादांना हस्ते परहस्ते करून देण्यात आली. महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकवणे हे उपमुख्यमंत्र्याला शोभत नाही आणि त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी दमबाजी केली, तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा “मेसेज” अजितदादा पर्यंत व्यवस्थित पोहोचविण्यात आला. त्याचवेळी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरवर अजितदादांची पाठराखण केली, पण भाजपच्या त्यांच्याही वरिष्ठ नेत्यांनी मात्र अजितदादा आणि त्यांच्या पक्षाला व्यवस्थित “वेसण” घातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात अजितदादांची बाजू घेणारी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यातला “राजकीय इशारा” लक्षात घेऊन त्यानंतर अजितदादांनी आपल्याला कर्तव्य बजावणाऱ्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांविषयी सर्वोच्च आदर असल्याचे ट्विट केले. त्याचबरोबर आपण बेकायदा गोष्टींच्या पाठीशी उभे राहणार नाही. उलट बेकायदा गोष्टींवर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे याचे समर्थन केले. किंबहुना अजितदादांना त्या पद्धती ट्विट करावे लागले.
– अमोल मिटकरींची माघार
त्यानंतर अमोल मिटकरी यांना देखील अंजना कृष्णा यांच्याविरुद्ध चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र मागे घ्यावे लागले. त्यांना दिलगिरी व्यक्त करणारी ट्विट करावे लागले. सोलापूर घटने संदर्भात मी केलेले बिनशर्त मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणावे लागले. एकूणच अजितदादांना आणि त्यांच्या समर्थकांना या सगळ्या प्रकरणात नमते घ्यावे लागले. भाजपच्या सत्तेच्या वळसणीला येऊन आपला तथाकथित स्पष्टवक्ता स्वभाव आणि त्याच्या नावाखाली दादागिरी चालणार नाही. भाजप म्हणजे काँग्रेस नाही. इथे आपली दादागिरी फार काळ सहन करून घेतली जाणार नाही. प्रसंगी आपल्या पक्षाची हेकडी देखील काढण्यास भाजप मागे पुढे पाहणार नाही, हे अजितदादांच्या आता लक्षात यायला हरकत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App