विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray भाजपने शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.Uddhav Thackeray
राज्यात येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट व मनसेने युतीची घोषणा केली आहे. या युतीमुळे मुंबईतील महायुतीचे राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेची धार अधिकच धारदार केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, नाशिकमध्ये “ठाकरे बंधू एकत्र” आल्यावर ढोल पिटणारे कार्यकर्ते अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपात सामील होतात तेव्हा त्यावर संजय राऊत दुःख व्यक्त करत नैतिकतेचे प्रश्न विचारतात, हा सरत्या वर्षांतील सर्वात मोठा राजकीय विनोद म्हणावा लागेल.Uddhav Thackeray
…आणि नैतिकता थेट रसातळाला गेली
राजकारणात कार्यकर्त्यांसमोर नैतिकतेचा आदर्श नेत्यांनीच ठेवायचा असतो. पण तो आदर्श केव्हाच उद्ध्वस्त झाला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी, मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी, उद्धव ठाकरे यांनी कोणताही वैचारिक विधीनिषेध न पाळता, क्षणार्धात भूमिका बदलत काँग्रेससोबत आघाडी केली. त्या दिवशी केवळ सत्ता-समीकरण बदलले नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण सुरू झाली… आणि नैतिकता थेट रसातळाला गेली.
नैतिकतेवर प्रश्न करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे
ज्या नेतृत्वाने स्वतः विचार, भूमिका आणि शब्द यांची किंमत शून्यावर आणली, ते आज कार्यकर्त्यांना नैतिकतेचे धडे देत आहेत… हा दुटप्पीपणाचा कळस आहे. नेतेच जर संधीसाधूपणाचे प्रतीक बनले असतील, तर कार्यकर्त्यांकडून निष्ठेची अपेक्षा तरी कोणत्या तोंडाने करणार? आज जे घडते आहे ते अचानक नाही; ते 2019 मध्ये पेरलेल्या संधीसाधू राजकारणाचेच पीक आहे. नैतिकतेवर प्रश्न विचारण्याचा अधिकार ज्यांनी आधी गमावला आहे, त्यांनी उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अधिक योग्य ठरेल, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये काय घडले होते?
उल्लेखनीय बाब म्हणजे काल नाशिक येथील ठाकरे गट व मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. पण मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या विरोधाला केराची टोपली दाखवत त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. या घटनाक्रमावरून विरोधकांनी भाजपच्या राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे भाजपने राजकीय नैतिकतेच्या घसरणीची सुरुवात महाविकास आघाडीच्या स्थापनेसोबतच झाल्याचा दावा करत विरोधकांची टीका फेटाळून लावली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App