विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवण्यासंबंधी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांतील संभाव्य पराभवाच्या भीतीने 96 लाख खोटे मतदार असल्याचा धादांत कपोलकल्पित आकडा ठोकून दिला. हा आकडा कुठून आणला हे त्यांनाही माहिती नाही, असे भाजपने म्हटले आहे.Raj Thackeray
राज ठाकरे यांनी रविवारी राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याचा आरोप केला होता. केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद व महापालिकांकडे वळवला आहे. या निवडणुकांचा निकाल निश्चित झाला आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी महानगरांमधील मतदार याद्यांत सुमारे 96 लाख खोटे मतदार घुसवण्यात आलेत. त्यामुळे मतदारयाद्या स्वच्छ होईपर्यंत व त्या सर्वच राजकीय पक्षांना मान्य होईपर्यंत आपण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त आरोप केला आहे.Raj Thackeray
विरोधक घटनात्मक संस्थाविषयी संशय निर्माण करत आहे
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी बोलताना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूकीसाठी जी मतदार यादी अद्याप अंतिमतः उपलब्ध नाही त्यावर गदारोळ करून गोंधळ माजविण्याचा गंभीर कट आता उघडकीस येऊ लागला आहे… हेतू स्पष्ट आहे! संवैधानिक संस्थांबाबत संशय निर्माण करणे, लोकांची दिशाभूल करणे आणि होणाऱ्या पराभवासाठी कारणे शोधणे!!
मतदार यादीतील खोटे मतदार काढावेत यासाठी विरोधी पक्षातील उध्दव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे अशा मातब्बर नेत्यांची फौज निवडणूक आयोगाच्या दारात थडकली. मतदार यादी शुध्द झाल्याशिवाय मतदान घेऊच नये याची जोरदार मागणी करण्यात आली. राज ठाकरे यांनी तर 96 लाख खोटे मतदार असल्याचा धादांत कपोलकल्पित आकडाही ठोकून दिला. तो कुठून आणला त्यांनाही माहीत नाही! केवळ लोकशाही संस्था खिळखिळ्या करून त्यांची बदनामी करण्यापलीकडे कोणताही हेतू नाही आणि त्यासाठीच फेक नॅरेटिव्हची फेकाफेकी सुरू आहे. कारण मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे प्रारूप अद्याप जाहीरच झाले नाही.
मतदार याद्यांचे प्रारूप 6 नोव्हेंबरला जारी होणार
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 29 महापालिकांसाठी ज्या मतदार याद्या वापरण्यात येणार त्याचे प्रारूप 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर या यादीवर आक्षेप, हरकती 14 नोव्हेंबर पर्यंत नोंदविण्याची मुदत आहे. या प्रारूपावर घेण्यात आलेले आक्षेप, हरकतीवर तपासून अंतिम यादी 28 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. हि माहिती जाहीर उपलब्ध आहे. जी मतदार यादी विधानसभेला वापरली गेली ती यादी सुध्दा प्रारूप-आक्षेप-अंतिम यादी याच प्रक्रियेतून गेली आहे. त्यावेळी सुध्दा कुणी आक्षेप घेतला नाही. मात्र पराभवानंतर खापर फोडायला मतदारयादीचे निमित्त शोधले. हे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे. ते हाणून पाडले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंचे राजू पाटलांच्या पराभवाप्रकरणी खोटे दावे
केशव उपाध्ये यांनी आपल्या अन्य एका पोस्टद्वारे राज ठाकरे यांच्यावर खोटारडेपणाचाही आरोप केला आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी 30 जानेवारी 2025 रोजी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले होते. राजू पाटलांचे एक गाव आहे. तिथे फक्त पाटलांनाच मतदान होते, साधारणतः १४०० मतदारांचे गाव आहे. तिथे फक्त यांनाच मतदान होते. याआधी राजू पाटिलांचे भाऊ उभे होते तेव्हा त्यांना मतदान झाले… जेव्हा हे खासदारकीला उभे होते तेव्हा त्यांनाच मतदान झाले. मात्र यावेळी राजू पाटलांना एक ही मत पडले नाही… अख्ख्या गावातून एकही मतदान झाले नाही. जी 1400 मते आहेत, ती दरवेळी राजू पाटलांना मिळायची, त्या गावात एकही मत पडत नाही? … लोकांनी मतदान केले पण मतदान गायब झाले” ही सगळी विधाने त्या वरळीतील पदाधिकारी मेळाव्यातील राज ठाकरे यांची आहेत…
दुसऱ्याच दिवशी लोकांनी खातरजमा केली…प्रत्यक्षात राजू पाटील यांना एकाही गावात शून्य मते नव्हती व ज्या राजू पाटील यांच्या गावाचा उल्लेख राज ठाकरे करीत होते त्या गावात मत तर मनसेला पडलीच पण त्याशिवाय त्या गावातील मताधिक्य हे मनसेला होते. काही नाही नुकतंच राज ठाकरे यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यासमोर बोलताना 96 लाख मते बोगस असल्याचा आरोप केला त्यावरून हा किस्सा आठवला, असे उपाध्ये म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App