विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या संबोधनावरून राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, बन यांनी राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ‘पंतप्रधानांनी जेव्हा देशाला संबोधित केले, तेव्हा देशद्रोही आणि भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांची पायाखालची वाळू सरकते, त्यामुळेच तुम्हालाही हादर बसला,’ अशी टीका त्यांनी केली. राऊत साहेब तुम्ही मात्र सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवता, पण तो भोंगा देशासाठी नाही, तो राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी असतो, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे.Sanjay Raut
पत्राचाळीवरून राऊतांवर टीका
नवनाथ बन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजवर 140 कोटी जनतेला ऐतिहासिक भेटी दिल्यात. 370 कलम हटवून देश एकसंघ केला. राममंदिराच्या भूमिपूजनाचा शतकानुशतकांचा स्वप्न पूर्ण केला. आणि कालच जीएसटीतून दोन लाख कोटींची सवलत जाहीर करून सामान्य माणसाला थेट दिलासा दिला. पण संजय राऊत यांना हे दिसत नाही. कारण त्यांचे डोळे पत्राचाळीच्या काळ्या पैशांनी झाकलेले आहेत. आज मोदींवर टीका करण्याआधी, आधी पत्राचाळीत मराठी माणसाला फसवून उचललेले 50-50 लाख रुपये परत द्या. मराठी माणसाची लूट करून तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही.Sanjay Raut
फरहानने बॅटची बंदूक दाखवली, आमच्या खेळाडूंनी मिसाईल टाकले
नवनाथ बन म्हणाले, पाकिस्तानी खेळाडू फरहानने बॅट बंदुकीसारखी धरून केलेलं सेलिब्रेशन हे निंदनीय आहे. पण त्यावरून मोदी सरकारला दोष देणं हे हास्यास्पद आहे. मोदी सरकारचं काम आहे देशाचं रक्षण आणि भारतीय क्रिकेट संघाचं काम आहे मैदानावर लढणे. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला दोनदा पराभूत करून क्रिकेटरूपी मिसाईल टाकलं आहे. सूर्यकुमारसारख्या खेळाडूंनी पाकिस्तानचा अहंकार चिरडला. पण संजय राऊत यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं का? पाकिस्तानाविरुद्ध दोन विजयांनंतर एक तरी अभिनंदनाचं ट्विट राऊत साहेबांनी केलं नाही. उलट ते पाकिस्तानचा उदो-उदो करतात.
संजय राऊत म्हणजे क्रिकेट-जुगारी
भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी आरोप करत म्हटले की, संजय राऊत हे स्वतः जुगारी आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यात त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावला. कालच्या सामन्यात पाकिस्तान हरला आणि त्यामुळे राऊतांचे लाखो रुपये बुडाले. त्यामुळेच राऊत चिडून मोदी सरकार आणि बीसीसीआयवर आरोप करत आहेत.
पुढे ते म्हणाले, ही पहिली वेळ नाही. याआधीही राऊतांनी भारताविरुद्ध पैज लावली होती. पाकिस्तान जिंकण्यासाठी पैसे टाकले होते. पण भारत नेहमी जिंकतो आणि राऊत नेहमी हरतो. पाकिस्तानवर सट्टा लावून भारतीय संघावर आरोप करणं म्हणजे राष्ट्रद्रोहाचं दुसरं नाव आहे.
राऊत नेहमी पाकचे गोडवे गातात
नवनाथ बन म्हणाले, खेळाचं मैदान असो वा युद्धाचं मैदान, भारताने पाकिस्तानला नेहमी पराभूत केलं आहे. आपल्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला धूळ चारली आणि आपल्या सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमेत दहशतवाद्यांना यमसाधना पाठवलं. पण संजय राऊत मात्र नेहमी पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतात. ते पैज लावतात, पैसे गमावतात आणि मग मोदी सरकारवर चिडचिड करतात. देशभक्त भारतीय जवान आणि खेळाडू पाकिस्तानचा पराभव करतात, पण राऊत हे पाकिस्तानच्या जुगारात आपलं राजकारण गमावतात, असा टोला बन यांनी लगावला.
राऊतांचा पॅटर्न म्हणजे पाकिस्तानचा उदो-उदो!
नवनाथ बन म्हणाले, आज भारताची राष्ट्रभक्ती ही मोदीजींच्या पॅटर्नवर चालते. हा ‘मोदी पॅटर्न’ म्हणजे घरात घुसून शत्रूचा नाश करणं. हा पॅटर्न भारताच्या 140 कोटी जनतेला माहित आहे. हा नवा भारत घाबरत नाही, रडत नाही, तर पाकिस्तानला थेट उत्तर देतो. दुसरीकडे संजय राऊतांचा पॅटर्न म्हणजे पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, पाकिस्तानचा उदो-उदो करणे आणि पाकिस्तानचं गुणगान गाणं. हा पाकिस्तानचा पॅटर्न आहे, आणि राऊत हा पॅटर्न सतत पुढे नेत आहेत. पण भारताचा नवा पॅटर्न मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला सुरक्षित ठेवतो.’’
संजय राऊत यांना ‘पाकिस्तान रत्न’ पुरस्कार द्या
नवनाथ बन म्हणाले, जय शहा यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांना भारतरत्न द्या अशी मागणी व्हायला हवी. पण संजय राऊत यांना पाहून मात्र असं वाटतं की त्यांना ‘पाकिस्तान रत्न’ पुरस्कार द्यायला हवा. कारण राऊत हे पाकिस्तानप्रेमाचे खरे हक्कदार आहेत. संजय राऊत हे पाकिस्तानचे कायमचे प्रवक्ते आहेत. टीम इंडियाच्या विजयावर ट्विट नाही, पण पाकिस्तानसाठी नितांत प्रेम व्यक्त करतात. म्हणूनच त्यांना ‘पाकिस्तान रत्न’ देऊन थेट पाकिस्तानातच पाठवावं. तेवढंच योग्य ठरेल.
नाशिकची वाट लावून झाल्यावर राऊतांची ठाण्याकडे नजर
नवनाथ बन म्हणाले, संजय राऊत हे नाशिकचे संपर्कप्रमुख होते, आणि त्यांनी तिथली शिवसेना उद्ध्वस्त केली. आता त्यांनी मोर्चा ठाण्याकडे वळवला आहे. ठाणेकरांनी सावध राहावं, नाहीतर नाशिकसारखीच वाट ठाण्याचीही लागेल. राऊतांनी ठाण्याचे ‘बीड होईल’ असं वक्तव्य करून बीडची बदनामी केली. पण बीड हा संत, साहित्यिक, महात्म्यांचा जिल्हा आहे. मुकुंदराज, माऊली महाराज, स्व. गोपीनाथ मुंडे यांची ही भूमी आहे. दोन किरकोळ घटनांवरून संपूर्ण जिल्ह्याची बदनामी करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.
राऊतांचा झेंडा पाकिस्तानचा, दांडा राहुल गांधींचा
नवनाथ बन म्हणाले, संजय राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत टीका करतात. पण लक्षात ठेवा, संघाचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. हा झेंडा हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं प्रतीक आहे. उलट राऊतांचा झेंडा हा पाकिस्तानचा आहे आणि त्याला दांडा राहुल गांधींचा आहे. संघाचा दशहरा मेळावा शंभर वर्षांची परंपरा आहे. हिंदुत्वाचा भगवा झेंडा उंचावण्याचं काम संघ करतोय, आणि पाकिस्तानप्रेमाचं काम राऊतसारखे लोक करतात.
काँग्रेसला देश जाळायचा आहे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘नवनाथ बन यांचे विचार जाळू’ अशी भाषा केली. पण खरी गोष्ट अशी आहे की, त्यांना विचार जाळायचे नाहीत, त्यांना देश जाळायचा आहे. राहुल गांधी ट्विट करून नेपाळसारखी अराजकता निर्माण करण्याचे संकेत देतात आणि त्यांचे प्रादेशिक नेते महाराष्ट्रात जाळपोळीची भाषा करतात. पण 140 कोटी जनतेचे आशीर्वाद मोदींना आहेत. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला आहेत. आमचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आमचे विचार हिंदुत्वाचे आहेत. ते कधीही जळू शकत नाहीत. काँग्रेस कितीही जाळपोळ केली, तरी हिंदुत्वाचा दीप विझणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App