विनायक ढेरे
नाशिक : केंद्रातील मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज मुंबई दौऱ्यावर आले त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामागे नेमके काय राजकीय कारण असावे??, याची चर्चा भरपूर झाली. पण यामुळे भेटी मागचा राष्ट्रीय सुरक्षेचा अँगल मात्र सुटता कामा नये. Ajit Doval’s Mumbai tour: Threats from terrorist organizations and tight security measures angle
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी संघटना ऍक्टिव्हेट झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या आहेत. मुंबईत घातपात घडवण्याची योजना मध्य रेल्वेच्या मोटरमनमुळे आजच उघडकीस आली. भारताची आर्थिक प्रगतीची वाटचाल वेगाने सुरू असताना त्यामध्ये अडथळे उत्पन्न करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दहशतवादी कृत्य घडवण्यासाठी दाऊद इब्राहिमच्या गॅंगला चिथावणी मिळत असल्याच्याही बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांचा मुंबई दौरा फार महत्त्वाचा आहे.
वास्तविक अजित डोवाल यांच्यासारखे अतिवरिष्ठ आणि सुरक्षा विषयक सर्वात संवेदनशील अधिकारी ही कोणत्याही राज्याचा दौरा सहज करतील ही सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यामध्ये फक्त राजकीय अँगल शोधून जाणार नाही तर त्या मागचा सुरक्षा अँगल देखील त्याहीपेक्षा महत्त्वाचा असणे स्वाभाविक आहे.
देशपातळीवर सुरक्षा सुरक्षेला असणाऱ्या विविध धोके, त्यातही मुंबईसारखी आर्थिक राजधानी दहशतवादाच्या सावटाखाली कायम राहणे देशाला परवडणार नाही. या पार्श्वभूमीवर सुरक्षा विषयक आढावा आणि त्यापेक्षाही कठोर उपाय योजना यादृष्टीने अजित डोवाल यांचा दौरा असू शकतो, हा अँगल सर्वाधिक महत्त्वाचा आहे. ५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी सुरक्षेचा आढावा घेणे हाही या दौऱ्यामागील उद्देश असावा असे जाणकारांचे म्हणणे आहे.
मुंबई दहशतवाद्यांचे बनले टार्गेट?
आजवर अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यापासून कधीच मुंबई दौऱ्यावर आले नव्हते, त्यामुळे डोवाल यांचा मुंबई दौरा विशेष चर्चेत आला आहे. मागील काही महिन्यांपासून मुंबईला दशतवादी संघटनांनी धमक्या दिल्या आहेत. नुकतीच हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याकडे एक बोट सापडली होती, त्यात एके-४७ रायफल आणि दारू गोळा होता. हे प्रकरण सध्या एनआयए तपासात आहे. त्यातच आता बिष्णोई गॅंगचेही काही दहशतवादी महाराष्ट्रात पकडण्यात आले होते. आता कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याची टोळी भारतात अधिक सक्रिय झाल्याची माहिती सुरक्षा व्यवस्थेला मिळाली आहे. मुंबईत दहशतवादी कारवाया करण्यासाठी दाऊदला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी चिथावले आहे. त्यामुळे मुंबईतली स्लीपर सेलदेखील सक्रिय होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊदचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच दाऊदचा साथीदार छोटा शकील याचाही ठावठिकाणा सांगणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर केले आहे. अशा प्रकारे केंद्रीय सुरक्षा व्यवस्था आता देशातील विशेषतः मुंबईत दहशतवादी कारवाया रोखणे आणि अशा कारवाया करण्याचा मनसुबा आखणाऱ्या दहशतवादी संघटनांचा बिमोड करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा मुंबईत दौरा विशेष लक्ष केंद्रित करत आहे, असे जाणकारांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App