विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक मधल्या वादग्रस्त पुरोहित संघातली 38 वर्षांची मक्तेदारी अखेर संपली. सतत मनमानी कारभार चालविणाऱ्या सतीश शुक्ल यांची पुरोहित संघाने अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना पुरोहित संघाच्या सदस्यांनी एकत्र येऊन सतीश शुक्ल यांना अध्यक्षपदावरून दूर केले. त्यांच्या ऐवजी पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
सतीश शुक्ल गेली जवळपास 38 वर्षे पुरोहित संघाचे अध्यक्षपदावर होते. त्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून सुरुवात केली. पण नंतर टप्प्याटप्प्याने पुरोहित संघावर आपली पकड घट्ट केली. या दरम्यानच्या काळात पुरोहित संघाची घटना तयार होणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात तसे कुठलेही काम झाले नाही. उलट याच कालावधीत वेगवेगळ्या विषयांवरून वादग्रस्तता वाढली. सर्व समाजाचा साकल्याचा विचार यातून दूर झाला आणि संकुचित विचार बळावला.
विशेषतः गोदावरी आरतीच्या मुद्द्यावरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आमने-सामने आले. गोदावरी आरती करण्याचा परंपरागत हक्क फक्त पुरोहित संघाचाच आहे, असा दावा करून सतीश शुक्ल यांनी इतरांचा गोदावरी आरती करायचा हक्कच नाकारला होता. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरी आरती सारख्या पवित्र कर्मावरून वाद निर्माण झाला. नाशिक मधल्या स्थानिक आखाड्यांनी आणि राजकीय नेत्यांनी आणखी पेटविला होता. त्यावरून लाठ्या काठ्यांची धमकीची भाषा करण्यापर्यंत अनेकांची मजल पोहोचली होती. नाशिक हे फार पूर्वीपासून महापालिका क्षेत्र असताना येथे “ग्रामसभा” भरविण्याचा “उद्योग” काहींनी केला होता.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गोदावरी आर्थिक वेगवेगळ्या अडथळे आणण्याचा प्रयत्न सतीश शुक्ल यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत अनेकदा झाला. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात खुद्द राज्यपालांच्या भाषणात अडथळा आणण्याची मजल पुरोहित संघाने गाठली होती.
वास्तविक गोदावरी सेवा समितीने पुरोहित संघाचा अधिकार कधीच नाकारला नव्हता, पण सतीश शुक्ल यांना समितीत स्थान न मिळाल्याने त्यांनी जाणीवपूर्वक हा वाद वाढवून नासिककर आणि पुरोहित संघाची एक प्रकारे बदनामीच केली. स्थानिक पुरोहितांचा बुद्धीभ्रम केला होता. आता पुरोहित संघाची नवीन कार्यकारिणी सर्वसमावेशक होईल, अशी अपेक्षा आहे. कारण गोदावरी सेवा समिती समिती प्रतिदिवशी एक एक पाऊल पुढे जात असताना पुरोहित संघाला मात्र बदनामीच झेलावी लागत आहे.
सतीश शुक्ल मनमानी कारभार अनेक वर्ष सुरू होता. पुरोहित संघाचे बहुसंख्य सदस्य त्यांच्या मनमानी कारभाराला वैतागले होते. अखेर कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना पुरोहित संघाच्या सगळ्या सदस्यांनी एकवटून सतीश शुक्ला यांना अध्यक्ष पदावरून हाकलले. त्यांच्या ऐवजी कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात तरी आता पुरोहित संघाची दृष्टी सर्व समाजाच्या हिताची होऊन इतर वेगवेगळे विषय मार्गी लागतील. त्याचबरोबर गोदावरी आरतीचा वाद देखील मिटेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App