बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत राहुल गांधी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ दिला. ते म्हणाले, आत्तापर्यंत दिल्लीत विरोधकांच्या खूप बैठका झाल्या. पण त्या सगळ्या अपयशी ठरल्या. पाटण्यात मात्र आज जी बैठक झाली, त्यात सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली आणि देश वाचवण्यासाठी, देशाची विचारसरणी वाचवण्यासाठी एकत्र येण्याची प्रतिज्ञा विरोधकांनी केली आहे, अशी ग्वाही राहुल गांधींनी दिली. त्याच वेळी त्यांनी पाटण्यातून ज्याची सुरुवात होते, ती नंतर जन चळवळ बनते, असा ऐतिहासिक संदर्भ दिला. Patna mass movement, rahul gandhi gave reference in opposition meeting, but it was a half truth
राहुल गांधींनी दिलेला हा ऐतिहासिक संदर्भ निश्चित खरा आहे, पण तो संदर्भ अर्धसत्य आहे. कारण पाटण्यातून ज्या जन चळवळीची सुरुवात झाली, त्याचा संदर्भ थेट राहुल गांधींच्या आजीशी जोडणारा आहे आणि त्याचा उच्चार मात्र राहुल गांधींनी केला नाही.
– हा खरा इतिहास असा :
1970 च्या दशकात इंदिरा गांधींची संपूर्ण भारतावर जी पोलादी पंजाची राजवट घट्ट पकड धरून बसली होती, त्या विरोधात पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर जयप्रकाश नारायण यांनी एल्गार पुकारला होता.
पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींविरूद्ध जी ऐतिहासिक सभा घेतली, त्यानंतर खऱ्या अर्थाने भारताचे राजकीय दैव बदलले. तोपर्यंत इंदिरा गांधींच्या पोलादी पंजाची पकड संपूर्ण भारतावर घट्ट रुतून बसली होती. पण पाटण्यातून खऱ्या अर्थाने जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या या जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवला आणि नंतर त्याच आवाजाचे रूपांतर देशभरात पेटलेल्या जन चळवळीच्या वणव्यात झाले. या वणव्यामुळेच इंदिरा गांधींना आणीबाणी लादावी लागली आणि नंतर ती उठवावी देखील लागली.
Bihar | Opposition leaders' meeting being held in Patna, concludes https://t.co/uKnZpENTiT — ANI (@ANI) June 23, 2023
Bihar | Opposition leaders' meeting being held in Patna, concludes https://t.co/uKnZpENTiT
— ANI (@ANI) June 23, 2023
या जन चळवळीचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी स्वतः आघाडीवर राहून केले होते. यामध्ये त्यांना काँग्रेसचे भूतपूर्व अध्यक्ष आचार्य कृपलानी यांची देखील साथ लाभली होती. या जन चळवळीने इंदिरा गांधींची जुलमी राजवट 1977 च्या ऐतिहासिक निवडणुकीत फेकून दिली आणि पहिल्यांदा खऱ्या अर्थाने हिंदुस्थानात सत्ता परिवर्तन झाले. मोरारजी देसाई यांच्या रूपाने जनता पक्षाचे नेतृत्व पंतप्रधानपदी आले. भले ते मूळचे काँग्रेसी नेते असले तरी ते इंदिरा गांधींचे कट्टर विरोधक म्हणूनच कायम वावरले होते आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर मात करून जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून त्यांनी सरकार स्थापन केले होते. हा पाटण्यातून निर्माण झालेल्या जन चळवळीचा खरा इतिहास आहे.
राहुल गांधींनी हा संपूर्ण इतिहास सांगितला नाही. त्यांनी केवळ दिल्लीत विरोधकांची बैठक अपयशी होते, पण पाटण्यात मात्र यशस्वी होते आणि त्या यशस्वी बैठकीतूनच जन चळवळ निर्माण होते, असा संदर्भ दिला.
अर्थात आधीच्या ऐतिहासिक संदर्भात इंदिरा गांधींचे प्रभावी नेतृत्व विरुद्ध जयप्रकाश नारायण यांचे जन चळवळीचे प्रखर नीतिमत्ता असलेले नेतृत्व असा सामना होता. याचा उल्लेख राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यात बिलकुल केला नाही.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने दिल्लीत इंदिरा गांधींसारखे प्रभावी नेतृत्व अस्तित्वात आहे. पण त्यांनी इंदिरा गांधी सारखी देशावर आणीबाणी लादलेली नाही. जनतेच्या स्वातंत्र्याचा संकोच केलेला नाही. पण त्यापलीकडे जाऊन पाटण्यातून जर खरीच जन चळवळ उभी राहणार असेल, तर आज ज्या 15 पक्षांचे प्रमुख नेते विरोधकांच्या बैठकीला हजर होते, त्यापैकी नेमके जयप्रकाश नारायण कोण आणि जयप्रकाश नारायण यांना, ते सत्तेबाहेर राहिल्याने जे नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले होते, तसे नैतिक अधिष्ठान या 15 पक्षांचे नेत्यांपैकी नेमके कोणाला प्राप्त आहे??, हा खरा सवाल आहे.
राहुल गांधींनी पाटण्यातल्या जन चळवळीचा ऐतिहासिक संदर्भ जरूर दिला, पण तो अर्धवट होता. खरा संदर्भ वर उल्लेख केला आहे आणि तो काँग्रेसलाच राजकीय दृष्ट्या अडचणीत आणणारा आहे. ही वस्तुस्थिती राहुल गांधी समजून घेतील का आणि समजून घेतली तर त्यांना ती पचेल का?? हा खरा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App