
स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणा-या व देशासाठी सर्वस्व समर्पण करणा-या टिळकांना त्यांच्या हयातीतही अनेक आरोपांना सामोरं जावं तागलं. पण ‘टिळकांनी पैसे खाल्ले’ हा आरोप सर्वाधिक व्यथित करणारा आहे… Targetting Lokmanya Tilak by NCP mentality
भगवान दातार
(ज्येष्ठ पत्रकार)
लोकमान्यांसारख्या ज्ञानसूर्याच्या जीवनात अंधाराची किनार शोधण्याची उबळ काहीजणांना अधून मधून येते. राज ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाचा आधार घेत काहीजणांनी टिळकांविषयीची मनातली खदखद बाहेर काढण्याची हौस भागवून घेतली. मात्र हे करतांना ‘शिवछत्रपतींच्या समाधीच्या जिर्णोध्दारासाठी जमवलेले पैसे लोकमान्यांनी खाल्ले’ असा आरोप करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली. स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणा-या व देशासाठी सर्वस्व समर्पण करणा-या टिळकांना त्यांच्या हयातीतही अनेक आरोपांना सामोरं जावं तागलं. पण ‘टिळकांनी पैसे खाल्ले’ हा आरोप सर्वाधिक व्यथित करणारा आहे.
रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी लोकमान्यांनी शोधली नाही किंवा त्यांच्या हातून तिचा जिर्णोध्दार झाला नाही हा इतिहास सर्वश्रूतच आहे. यातलं महात्मा फुलेंचं श्रेय कुणीच नाकारत नाही. मात्र ही समाधी व तिच्यावरील मेघडंबरी नव्याने बांधून घ्यावी यासाठी टिळकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले हे वादातीत आहे. स्वातंत्र्य लढा, तुरुंगवास आणि आजारपण यामुळे टिळकांना उसंत अशी मिळालीच नाही. मात्र हाती घेतलेलं समाधीचं काम पूर्ण होत नसल्याबद्दल त्यांना खंत वाटत होती. ती त्यांनी अनेकदा व्यक्तही केली होती.
राज ठाकरे यांचा संदर्भ चुकला असला तरी त्यावर लगेच उसळून टिळकांवर अपहाराचे आरोप करणा-यांचे हेतू शुध्द नाहीत हेच दिसून येते. यासंदर्भात टिळकांनीच दि. ९ मार्च १९२० च्या केसरीत भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर लवकरच टिळकांचे देहावसान झाले. याचा अर्थ त्या अखेरच्या दिवसातही टिळकांचे जिर्णोध्दार व मेघडंबरीसाठी प्रयत्न चालू होते हे स्पष्ट होते. ‘समग्र टिळक’ च्या ६ व्या खंडात पृष्ठ ९७५ वर असलेल्या या उता-याचा फोटो मुद्दाम इथं देत आहे.
लोकमान्यांचं बुध्दिवैभव एवढं प्रदीप्त होतं की पैसे खायचेच असते तर आय.पी.एल. किंवा लवासासारख्या योजना त्यांना सहज सुचल्या असत्या. किंवा त्यावेळच्या प्लेगचा फायदा घेत त्यांनी उपचारकेंद्रांची कंत्राटं सहज मिळवली असती व सग्यासोय-यांना वाटली असती. पण उभ्या आयुष्यात स्वार्थ हा शब्द लोकमान्यांना कधी सुचलाच नाही.
लोकमान्यांच्या मृत्युनंतर समाधी व मेघडंबरीचे काम झाले. पण त्याची प्राथमिक सुरुवात व त्यासाठीचे प्रयत्न लोकमान्यांनी केले होते हे नाकारता येणार नाही.
काहीतरी खुसपट काढून लोकमान्यांवर आरोप करण्याचा प्रयत्न अनेकदा होत असतो. काही वर्षांपूर्वी, नेमकं सांगायचं तर १४ ऑक्टोबर २०१० च्या सुमारास पुण्यातील हुजूरपागा प्रशालेत एक कार्यक्रम झाला होता. कार्यक्रम केसरीवाड्याच्या जवळ आहे हे लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात ‘लोकमान्यांचा स्त्री शिक्षणाला विरोध होता’ असा सूर लावला होता. एक नवाच वाद उकरून काढण्याचा त्यांचा हेतू असावा. लोकांनी या विचारांना फारसा थारा दिला नाही. ( स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचे प्रश्न याविषयी लोकमान्यांनी लिहिलेल्या १३ लेखांचा संदर्भ देत हे विधान कसे चुकीचे आहे हे स्पष्ट करणारा एक लेख मी त्यावेळी दि. १४ ऑक्टोबर २०१० च्या दैनिक प्रभात मध्ये लिहिला होता. ) टिळकांवर बेफाट आरोप करणा-या प्रवृत्तीचं मूळ नेमकं कुठं आहे हे यातून स्पष्ट होईल.
Targetting Lokmanya Tilak by NCP mentality
(सौजन्य : फेसबुक )
महत्वाच्या बातम्या
Array