तथाकथित पुरोगामी, समाजवादी, परखड तसेच निष्पक्ष असल्याचा दावा करणारे अनेक पवारभक्त पत्रकार आणि कार्यकर्ते आहेत. यातले अनेकजण पवारांचे निरनिराळ्या अर्थांनी लाभार्थी आहेत. हे पवारभक्त संधी मिळेल तेव्हा शरद पवारांचे दैवतीकरण करत राहतात. कोणत्याही घटनेशी पवारांचा बादरायण संबंध जोडून त्यांची नसलेली थोरवी वाढवण्याचा प्रयत्न करणारे असंख्य आहेत. पवारभक्तांची ही कुजबुजगॅंग आता आडून-आडून थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहे. ऐंशी वर्षांचा योद्धा मास्क घालून मैदानात उतरला, अशी भाटगिरी करत महाराष्ट्राची सूत्रे शरद पवारांनीच आता ताब्यात घ्यावीत, असे सुचवण्याचा प्रकार सुरु झाला आहे.
निलेश वाबळे
तथाकथित पवारनिष्ठांनी आजपर्यंत शरद पवारांचे दैवतीकरण करण्यासाठीची कोणतीही संधी सोडलेली नाही. प्रत्येक घटनेशी पवारांचा बादरायण संबंध जोडून त्यांची महती गाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या स्थापनेत छोट्या पवारांनीच मोठा खोडा घातला तरी मोठ्या पवारांना आघाडीचे शिल्पकार म्हणण्यात त्यांनी धन्यता मानली. मात्र, आता या कुजबुजगॅंगने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शरद पवार यांनीच स्वीकारावी असा नवीन ट्रेंड सुरू केला आहे.
चीनी व्हायरसरचे संकट महाराष्ट्रात सुमारे दोन महिन्यांपासून सुरू झाले. या सर्व काळात उध्दव ठाकरे हे या कुजबुजगॅंगचे डार्लींग होते. त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळली असल्याचे सांगितले जात होते. त्यांच्या बोलण्याची शैली, त्यामधून ते देत असलेला विश्वास यावरून सोशल मीडियामध्ये कौतुकानेच वर्षाव होत होते. पण सिल्हवर ओकवरून सूत्रे हलू लागली आणि गेल्या काही दिवसांपासून उध्दव ठाकरे अचानक या सगळ्यातून गायब झाले. ठाकरे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत नाहीत, यावर मुद्दाम भर दिला जाऊ लागला. प्रकारच्या बातम्या पसरविल्या जाऊ लागल्या. त्यातच त्यांच्या आमदारकीचा घोळ सुरू झाला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही उध्दवना संपर्क साधावा लागला. त्यानंंतर तथाकथित लिबरल गॅंग आणखीनच बिथरली.
या सगळ्या काळात पवार कोठेही चित्रात नव्हते. राज्यात जटील राजकीय समस्या निर्माण झालेली असतानाही ते दिसत नव्हते. आपल्या मुंबईतील निवासस्थानी बसून पत्रांचे राजकारण सुरू होते. त्यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले. लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद असल्याने राज्याचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. महामारीमुळे राज्याचा आरोग्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे केंद्राने राज्याला मदत करणे आवश्यक आहे. राज्याने कर्ज काढण्यापेक्षा केंद्राने कर्ज काढून राज्यांना मदत करण्याचे आवाहन शरद पवार यांनी पत्रातून केले. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्व राज्यांची बैठक बोलावली. त्यानंतर या कुजबुज गॅंगने पवारांच्या पत्रामुळेच पंतप्रधानांनी ही बैठक घेतल्याचे सांगायला सुरूवात केली. प्रत्यक्ष मदतकार्यात सहभाग नसतानाही महाराष्ट्रात असे वातावरण तयार करण्यात आले की शरद पवार पडद्याआडून सूत्रे हलवित आहेत.
या सगळ्या काळात महाराष्ट्रातील चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. मुंबईत तर आकडा वाढतच चालला आहे. मुंबई आणि पुणे ही राज्यातील सर्वात मोठी दोन आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाची शहरे आज कोरोनाची हॉट स्पॉट बनली आहेत. परंतु, राज्य सरकार भंजाळलेल्या स्थितीत आहे. लॉकडाऊन वाढवावा तर अर्थव्यवस्था आणखी गर्तेत जाईल हे त्रांगडे झालेले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. राज्यातले बहुतांश अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे सांगण्याचीही गरज नाही. उध्दव यांच्यापेक्षा शरद पवार यांनाच मानणाºयांची संख्या अधिक आहे.
प्रशासकीय पातळीवरील अपयश हे उध्दव यांचेच आहे आणि श्रेय पवारांच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न होत आहे. याच प्रशासनाच्या अपयशाचे माप मात्र पवारांच्या पदरात पडणआर नाही, याची काळजी घेतली जात आहे. पवारांच्या भाटांची ही आजपर्यंतची खेळी राहिली आहे. पण, मुळात प्रश्न उपस्थित होतो की उध्दव अनुनभवी आहेत, प्रशासनावर त्यांची मांड नाही हे माहित असताना आघाडीचे एक शिल्पकार म्हणून त्यांनी प्रयत्न का केले नाहीत. त्यांना कोणी अडविले होते का? तर त्याचे उत्तर नाही, असेच आहे. परंतु, कदाचित उध्दव यांची या निमित्ताने बदनामी होत असेल तर होऊ द्या, अशीही खेळी तर नाही ना? अशी शंका यावी असे वातावरण आता निर्माण केले जात आहे.
चीनी व्हायरसचा मुकाबला करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, हे निश्चित. परंतु, हे अपयश केवळ उध्दव ठाकरे यांचे दाखविण्याचा प्रयत्नही सुरू झाला आहे. यामध्ये एक आणखी विशेष आहे. आजपर्यंत प्रशासनावरील पकड, धडाडीचा प्रशासक अशी अजित पवारांची प्रसिध्दी करण्यात हीच कुजबुजगॅंग पुढे होती. मात्र, आता या सगळ्या चित्रातून अजित पवारांना वगळण्यात आले आहे. अजित पवारांचे कोठे नावच नाही. उलट शरद पवार यांना पुढे केले जात आहे. आता पूर्ण फोकस शरद पवार कसे संकटाच्या काळात बाहेर पडले आहेत, हे दाखविण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी अगदी १९९३ चा लातूरच भूकंप असो की मुंबई बॉँबस्फोट, पवारांनी कशा पध्दतीने योध्याप्रमाणे परिस्थिती सावरली हे सांगितले जात आहे. बिचारे उध्दव ठाकरे, वडीलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी जावे की आपल्या खुर्चीचे दावेदार मानून राजकारण करावे, हेच त्यांना समजेनासे झाले असेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App