नाशिक : ठाकरे बंधू एकत्र; पवार काका अस्वस्थ, शिंदे + अजितदादांना भाजपची सत्ता धरावी लागणार घट्ट!!, असे राजकीय समीकरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे पवार काका अस्वस्थ होतील. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपची सत्ता घट्ट धरावी लागेल, अशी शक्यता आहे. वास्तविक एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची खरी लढत महाराष्ट्रात बलाढ्य बनलेल्या भाजपच्या सत्तेशी होईल, पण त्याचे परिणाम मात्र पवार काका, एकनाथ शिंदेंचे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना जास्त भोगावे लागतील. Thackrey brothers
कारण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये प्रचंड उत्साह संचारून त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. जुन्या – नव्या शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना उत्साहाचे उधाण येऊन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात ते बदल घडवून आणायचा प्रयत्न करतील. याचा पहिला परिणाम म्हणजे पवार काकांनी 2019 मध्ये बांधलेली ठाकरे आणि पवार ही राजकीय मोट गळून पडेल. पवार या सगळ्या खेळीतून बाजूला पाडले जातील. कारण ठाकरे बंधू महाराष्ट्रातला “ठाकरे ब्रँड” अधिक मोठा करायचा प्रयत्न करतील. तशीही महाराष्ट्रात “ठाकरे ब्रँड”ची किंमत पवार ब्रँड पेक्षा मोठी होतीच, ती आणखी वाढेल. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला टिकून राहिले तर पवार ब्रँडची किंमत शिल्लक उरेल.
त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपल्याला डावलले जाते अशी भावना असणाऱ्या शिवसैनिकांना ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे नवी वाट मिळेल. ते शिवसेना किंवा मनसेमध्ये प्रवेश करून आपली राजकीय सोय लावण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गोची होईल. भाजपबरोबरच्या सत्तेमध्ये एकनाथ शिंदे सध्या कितीही अस्वस्थ असले, तरी भाजप म्हणेल आणि भाजप देईल, त्या सत्तेच्या तुकड्यावर त्यांना समाधान मानावे लागेल. पण भाजपची सत्ता त्यांना घट्टच धरावी लागेल, अन्यथा त्यांच्याबरोबर असलेले आमदार आणि शिवसैनिक ठाकरे बंधूंच्या पक्षांची वाट धरल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आपला शिवसेना नावाचा पक्ष आपल्याच बरोबर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंना इच्छा असो अथवा नसो भाजपची सत्ता घट्ट धरावी लागेल.
दुसरीकडे अजित पवारांच्या सत्तेत मोठा वाटा खेचून घेण्यासाठी पवार काका उत्सुक असताना अजितदादांना भाजप आणि पवार काका एकत्र येऊ नयेत याची “काळजी” घ्यावी लागेल. त्यामुळे भाजप देईल, त्या सत्तेच्या तुकड्यावर समाधान मानत राहावे लागेल. पवार काकांना आपला जुना मित्र काँग्रेसची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अजितदादांनी पवार काकांची डाळ भाजपकडे शिजू दिली नाही, तर काकांना काँग्रेसचा पर्याय चाचपडून पहावा लागेल. अन्यथा त्यांच्या मुलीचे राजकीय बस्तान बसणे कठीण होईल.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या केवळ सकारात्मक बातम्यांमुळे हे पडसाद उमटतील. ते जेव्हा प्रत्यक्ष एकत्र येतील आणि शिवसेना – मनसे युती विषयी खरंच सकारात्मक पाऊल टाकतील, त्या वेळचे परिणाम आणखी गंभीर असण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App