
- प्रतिकात्मकते बरोबर राजकीय, संघराज्यीय महत्त्वाची जपणूक
वृत्तसंस्था
हैदराबाद : नवीन पार्लमेंट आणि सेंट्रल व्हिस्टाच्या भूमिपूजन समारंभात तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सहभागी होणार आहेत. स्वतः राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ही इच्छा व्यक्त केली आहे. १० डिसेंबरला मोदींच्या हस्ते या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.
राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण शेतकरी आंदोलनाने तापलेले असताना तसेच या आंदोलनाचे निमित्त करून विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात एकवटत असताना तेलंगण राष्ट्र समितीचे अर्थात टीआररएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मोदींसमवेत भूमिपूजनात सहभाग नोंदविणे याला राजकीय महत्त्व आहे. त्याच बरोबर नुकत्याच झालेल्या हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने टीआरएसचे मोठ्या प्रमाणावर राजकीय नुकसान केले आहे.
भाजपने या लढाईत रणशिंग खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम विरोधात फुंकले होते. त्यांचेही भाजपने नुकसान केले परंतु, दोन्ही पक्षांच्या लढाईत मोठ्या प्रमाणात टीआरएसचे नुकसान झाले. त्यांना महापालिकेच्या ४४ जागांचा फटका भाजपमुळे बसला.
वरील राजकीय पार्श्वभूमीवर मोदींसमवेत प्रतिकात्मक का होईना चंद्रशेखर राव यांनी भूमिपूजन समारंभात सहभागी होणे याला राजकीय महत्त्व आहे. त्याच बरोबर भारतीय लोकशाही व्यवस्थेतील संघराज्य पध्दतीचेही महत्त्व अधोरेखित करणारे आहे.
दिल्लीत नवे पार्लमेंट आणि प्रशासकीय व्यवस्थेसाठी नव्या इमारती उभे राहणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे राव यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात नोंदविले आहे. सध्याचे पार्लमेंट आणि प्रशासकीय इमारती साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक जुन्या आणि ब्रिटिश काळातल्या आहेत. नवभारताच्या नव्या गरजांनुसार पार्लमेंट आणि नव्या प्रशासकीय संकुले उभे राहणे गरजेचे असल्याने सेंट्रल व्हिस्टा उभे करण्यात येत आहे.
Array