विशेष प्रतिनिधी
मुंबई – विदर्भातले नेते माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पण त्यांनी त्यांचे थेट नाव घेतले नाही.BJP leader dr. sunil deshmukh while entering congress targets sharad pawar
काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवशी काल सुनील देशमुख यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये घरवापसी केली. आपली भाजप नेत्यांविरोधात कुठलीच तक्रार नाही. पण विचारसरणी काँग्रेसची आहे, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. पण काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
- राष्ट्रवादी वर्धापनदिनी शरद पवार म्हणाले, शिवसेना हा सर्वात विश्वासार्ह पक्ष, सरकार पाच वर्षे टिकेल!
सुनील देशमुख म्हणाले, की काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व होते, तेव्हा तिथले सर्वांत प्रभावी नेते आम्हाला निवडणूकीचे तिकीटच मिळू द्यायचे नाहीत. मी त्यांचे नाव घेणार नाही. पण १९९९ साली काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आली. आम्हाला काँग्रेसची तिकीटे मिळाली आणि आम्ही सगळे एका झटक्यात काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलो. यात मी, अनिस अहमद, नाना पटोले, नितीन राऊत यांचाही समावेश आहे.
सुनील देशमुख हे शरद पवारांवर टीकास्त्र सोडताना व्यासपीठावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे मंत्री विश्वजित कदम आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी नाना पटोलेंनी केलेल्या स्वबळाच्या भाषेचे कौतूक केले. नानांची चार – पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये चैतन्य आणले, असे कौतूक सुशीलकुमार शिंदे यांनी केले. राहुल गांधींना पंतप्रधान झाल्याचे स्वप्न आपण पाहात असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.