विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : १० डिसेंबर २०१५… नवी दिल्लीतील विज्ञान भवन… ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवाचा सोहळा रंगला होता. राष्ट्रपती (कै) प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज राजकारण्यांची मांदियाळी दाटीवाटीने प्रेक्षकांमध्ये बसली होती. राष्ट्रपती म्हणून मुखर्जींचे चौकटीतील होते, सोनियांनी अतिशय लाघवी, प्राजंळ भाषण केले होते; पण राजकीय टोलेबाजी मात्र पंतप्रधानांनीच केली होती. When Modi said Sharad Pawar is Political meteorologist….
मोदींचे आटोपशीर भाषण थोडेसे खेळकर आणि चिमटे काढणारेही होते. शेतकरयांना हवामानबदलाची उपजतच चांगली जाणीव असते, असे सांगून ते म्हणाले होते की, “पवार हे तर उत्तम शेतकरी. त्यांना बदलते हवामान तर कळतेच; पण राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, हे ही पटकन समजते. तुम्ही त्यांच्याशी काही मिनिटे बोललात तरी देशातील बदलत्या राजकारणाची जाणीव तुम्हाला होईल.”
मोदी एवढ्यावरच थांबले नव्हते. त्यांनी मुक्तकंठाने कौतुक करताना पवारांना मुंबईतील अंडरवर्ल्ड संपविण्याचे श्रेयदेखील आश्चर्यकारकरीत्या दिले होते. ते म्हणाले होते, की अंडरवर्ल्डच्या कारवायांनी मुंबईमध्ये एकेकाळी अंधकार पसरला होता; पण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी अंडरवर्ल्डचा तो विळखा सोडविण्याची मोठी कामगिरी केली होती. वास्तविक पाहता, त्यावेळेला पवारांवर गुन्हेगारांना अभय दिल्याचे गंभीर आरोप अण्णा हजारे, गो.रा. खैरनार यांच्यासारख्यांनी केले होते. भाजपचे नेते (कै) गोपीनाथ मुंडे यांनी तर राजकारण्याच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होते. पुढे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डचा चांगलाच सफाया केला होता. असे असूनही मोदींनी अंडरवर्ल्ड संपविण्याचे श्रेय पवारांना दिल्याचे अनेकांना खटकले होते; काहींना आश्चर्य वाटले होते.
याच कार्यक्रमात पवारांच्या ‘आन माय टर्म्स’ या इंग्रजीतील आणि ‘लोक माझे सांगाती’ या मराठीतील आत्मचरित्राचे प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते झाले.
‘पवार जेव्हा राजकारणाच्या उच्चस्थानी होते, तेव्हा मी गुजरातमधील गल्लीबोळात काम करणारा कार्यकर्ता होतो,’ अशी टिप्पणी करून मोदी म्हणाले होते की,“अखंड आणि एकनिष्ठ साधना हे पवारांच्या यशाचे रहस्य आहे. त्यांचा पिंडच मुळी सामाजिक जाणिवेचा आहे. बारामतीला भेट दिली तर त्यांच्या रचनात्मक कार्याची ओळख होऊ शकेल. आणि हीच सामाजिक जाणीव त्यांच्या राजकारणाचे सर्वांत मोठे शक्तिस्थान आहे. एखाद्या उद्दिष्टासाठी आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही. पवार कुठेही असले, कोणत्याही पदावर असले तरी गाव, शेती आणि शेतकरी त्यांच्या चिंतनाचा विषय असतो. अगदी क्रिकेट संबंधित बैठकीतही ते चर्चा शेतीवर घेऊनच येतात. अगदी ऊस हा शब्द जरी तुम्ही काढला तर पवार तुम्हाला ऊस, साखर, आयात- निर्यात हा विषय तासभर तरी समजावून सांगतील.”