वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मतदानाच्या टप्प्यांमध्ये बदल करून ते कमी करण्यात येतील, अशा अफवा सोशल मीडियातून पसरविण्यात आल्या होत्या. त्या अफवांवर निवडणूक आयोगाने पडदा टाकला आहे. मतदान आधीच्या नियोजनाप्रमाणे उरलेल्या ४ टप्प्यांमध्येच होईल, असा खुलासा आयोगाने केला आहे.No such plan of clubbing phases: Election Commission of India (ECI) on speculations about the Commission clubbing remaining Assembly election phases in West Bengal into one
मतदानाचे टप्पे आधी नियोजित आणि जाहीर केल्याप्रमाणेच पार पडतील. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता मतदानाचे ४ टप्पे राहिले आहेत. तेथे नियोजित तारखांनाच मतदान होणार आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचार करण्याच्या विषयावर या बैठकीत विचार विनिमय होणे अपेक्षित आहे.
कोविड प्रोटोकॉल पाळून रॅली, रोड शो, छोट्या – मोठ्या सभा घ्याव्यात अन्यथा प्रचारावर निर्बंध आणावे लागतील, असा इशारा निवडणूक आयोगाने यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
सर्व राजकीय पक्ष प्रचारात जोरात असले, तरी सत्ताधारी तृणमूळ काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या प्रचारात लोकांची तुफान गर्दी होताना दिसते आहे. यातून कोरोना प्रकोप होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्याच्या सूचना राजकीय पक्षांना दिल्या आहेत.
नेते या सूचना काही प्रमाणात पाळताना दिसत आहेत. पण तरीही कोरोना फैलावाचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.