राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योगपती अतुल चोरडिया यांच्याकडे “गुप्त” असलेली किंवा नसलेली भेट झाल्यानंतर महाराष्ट्रात बातम्यांचे पेव फुटले. शरद पवारांना कोणतेही स्थितीत भाजपकडे “खेचून” आणण्याची जबाबदारी अजित पवारांना भाजप नेतृत्वाने दिल्याच्या बातम्या आल्या. त्यासाठी पवारांना केंद्रात कृषिमंत्री पद, नीती आयोगाचे अध्यक्षपद, सुप्रिया सुळे यांना केंद्रात अड्जेस्ट करून घेणे, जयंत पाटलांना महाराष्ट्र जलसंपदा मंत्रीपद देणे वगैरे ऑफर अजितदादांकरवी दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी त्यांच्या हवाल्याच्या सूत्राने केल्या. Who really is capable of offering anything to sharad pawar??
त्यावर शरद पवार आणि अजित पवारांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी खुलासे देखील विचारले. पण हे दोन्हीही नेते माध्यमांच्या प्रतिनिधींवर चिडले. सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे माध्यमांवर चिडले नाहीत. पण त्यांनी पण या चारही नेत्यांनी माध्यमांना दिलेली उत्तरे मात्र काही बाबतीत समान आहेत, ती म्हणजे काका – पुतणे केव्हाही भेटू शकतात. त्यात “गुप्त” वगैरे काही नाही. राजकीय भूमिका आणि नातेसंबंधांमधला ओलावा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना तसेच ठाकरे गट आणि काँग्रेसला सुनावले. या झाल्या शरद पवार – अजित पवार सेंट्रिक बातम्या!!
पण त्या पलीकडे जाऊन “ज्या सूत्रांच्या” हवाल्याने, मराठी माध्यमांनी पवारांना भाजपने ऑफर दिल्याच्या बातम्या दिल्या होत्या, ती सूत्रे नेमकी कोणाची, शरदनिष्ठ अथवा अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस मधली?? की भाजप मधली?? की अन्य दुसऱ्या किंवा तिसऱ्या पक्षातली??, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यापैकी कुठल्याही सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी बातम्या दिल्या, तरी त्या खोट्या ठरल्या.
- शरद पवार म्हणजे जपानी बाहुली, प्रत्येकाला वाटतं की ती आपल्यालाच डोळा मारतेय; गडकरींची तुफान फटकेबाजी
मग ही ऑफर खरंच दिली की नाही, हे कोण सांगू शकेल??, तर त्याचे उत्तर आहे, ही ऑफर फक्त आणि फक्त भाजपचे केंद्रीय नेतृत्वच देऊ शकते. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची, राष्ट्रवादीतल्या कुठल्याही गटाची किंवा महाराष्ट्रातल्या बाकी कुठल्याही पक्षाची असली ऑफर देण्याची राजकीय क्षमताच नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली स्थानिक सूत्रे त्या विषयासंदर्भात संपूर्णपणे कुचकामीच आहेत. तरी देखील या सूत्रांच्या हवाल्यावर अवलंबून राहून मराठी माध्यमांनी जर पवारांना केंद्रात कृषिमंत्री पदाची, नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची वगैरे ऑफर दिल्याच्या बातम्या दिल्या असतील, तर मराठी माध्यमांच्या “विशिष्ट बुद्धीची” ती कमाल मानावी लागेल!! पण सध्या मराठी माध्यमे आहेतच तशा “विशिष्ट बुद्धीची”…!! ती कुठल्या “बुद्धीची” हे महाराष्ट्रातल्या जनतेला पक्के माहिती आहे.
द्यायची, तर थेटच ऑफर देईल ना!!
त्या पलीकडे देखील एक मुद्दा आहे, तो म्हणजे पवारांना जर कोणतीही ऑफरच द्यायची असेल, तर ती भाजपचे केंद्रीय नेतृत्व थेटच देईल ना… त्यासाठी अजित पवार किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याची मध्यस्थी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हवीच कशाला?? या संदर्भात शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या अमित शाह यांच्याबरोबर गुजरात मध्ये झालेल्या बैठकांचा हवाला देता येऊ शकतो. गुजरात मध्ये अदानींच्या घरी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी खास चार्टर्ड प्लेनने अमित शाहांची भेट घेतल्याच्या बातम्या त्यावेळी माध्यमांनी दिल्यास होत्या ना!! अजित पवारांनी 5 जुलैच्या भाषणात त्या बातमीला कन्फर्मेशनही दिले होते ना!! तसेही पवारांना मोदींकडे डायरेक्ट एक्सेस आहे, असे राष्ट्रवादीतलेच लोक फुशारकीने सांगत असतात ना!!
लटकलेली सूत्रे, हवेतल्या बातम्या!!
याचा अर्थ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला शरद पवारांपर्यंत कुठलीही ऑफर घेऊन जायला किंवा न जायला कोणाही मध्यस्थाची गरज नाही. मग तरी कुठल्यातरी भलत्याच सूत्रांच्या हवालाने मराठी माध्यमे पवारांना ऑफर दिल्याच्या बातम्या देतात तरी कशा??, तर याचेही उत्तर हे आहे, की मराठी माध्यमांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचच नाही!! तिथपर्यंत पोहोचून कुठल्या बातम्या काढण्याची त्यांची क्षमता नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात सूत्रे पेरून वगैरे ठेवण्याची मराठी माध्यमांची बिलकुल क्षमता नाही. त्यामुळे मग मधल्या मध्ये कुठे तरी “लटकलेली सूत्रे” या माध्यमांना बातम्या पुरवतात आणि त्या बातम्या माध्यमे 24 × 7 चालवतात. यातून त्या बातम्या आत्तापर्यंत जशा फसत आल्या, तशाच पवारांच्या ऑफरच्या बातम्या फसल्या आहेत!!… बाकी दुसरे काही नाही!!
Who really is capable of offering anything to sharad pawar??
महत्वाच्या बातम्या
- Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे
- हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित
- योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!