वृत्तसंस्था
कालीघाट : कोळसा घोटाळा प्रकरणात आपले पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्याची पत्नी रूजिरा बॅनर्जी यांना ED समन्स येताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आहेत.Mamata Banerjee erupted as soon as Abhishek Banerjee received the ED notice; BJP has been the target of a barrage of baseless allegations
त्यांनी भाजपवर एकापाठोपाठ एक बेछूट आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. ED, सीबीआयचे समन्स दाखवून भाजप आम्हाला घाबरवू शकत नाही. भाजपा आमच्यासमोर राजकारणात टिकू शकत नाही. म्हणूनच केंद्रीय तपास संस्थांचा वापर करून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना केंद्र सरकार दडपू पाहत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी काली घाट येथे केला.
जिथे जिथे भाजपने लोकशाही दडपून टाकली आहे त्या प्रत्येक ठिकाणी तृणमूल काँग्रेस घुसून भाजपला हैराण करेल असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला. तृणमूल काँग्रेस छात्रपरिषदेच्या संस्थापन दिनानिमित्त त्या बोलत होत्या.
अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या भाषणातून ममता बॅनर्जी यांचीच री ओढली. सीबीआय, ED यांच्यासारख्या तपास संस्थांच्या नोटिसा आणि समन्स पाठवून भाजप आम्हाला घाबरवू शकणार नाही. आमचे तरुण आणि विद्यार्थी कार्यकर्ते भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुरून उरतील, असा दावा अभिषेक बॅनर्जी यांनी केला.
तृणमूल काँग्रेसमध्ये इथून पुढे तरुण कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त वाव देण्यात येईल. कारण भाजप सोशल मीडियाद्वारे तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या बदनामीची मोहीमच चालवतो आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या छात्र परिषदेने आपले विद्यार्थी कार्यकर्तेही आक्रमकपणे तयार केले पाहिजेत, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले.
त्यावेळी त्यांनी एक अजब दावाही केला. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात भाजपचे पाच कार्यकर्ते ठार झाले, तर तृणमूलच्या सोळा कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. ईडीचे समन्स आल्यानंतर ममता बॅनर्जी आणि अभिजित बॅनर्जी अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत.