नाशिक : मोदी सरकार पाडायचा मनसूबा; पण प्रादेशिक पक्षांवर घाव; राहुल गांधीचा तिरपागडा राजकीय न्याय!!, हेच राजकीय वास्तव राहुल गांधींच्या दोन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून समोर आले.
– राहुल गांधींचे भाकीत
काँग्रेसने अल्पसंख्यांक नेते आणि कार्यकर्ते यांच्या बोलविलेल्या बैठकीत राहुल गांधींनी पुढच्या वर्षभरात नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नसल्याचे भाकीत केले. त्यासाठी त्यांनी महागाई आणि अस्थिर राजकीय परिस्थितीचा हवाला दिला. मुस्लिमांना अल्पसंख्यांक म्हणू नका त्यांना मुस्लिम म्हणूनच पॉलिटिकल ट्रीटमेंट द्या, अशी मखलाशी सुद्धा राहुल गांधी यांनी केली. मुस्लिमांना मुस्लिम असे स्वतंत्र नामाभिधान त्यांनी काँग्रेसला वैचारिक नवी दिशा दिली. काँग्रेसने मुस्लिमांमध्ये जाऊन आणखी जोमाने काम करण्याचा संदेश दिला. नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असे भाकीत करून मुस्लिमांना खुश केले.
– प्रादेशिक पक्षांवर आघात
पण राहुल गांधी एवढेच करून थांबले नाहीत. काँग्रेसने दलित समाजातील कार्यकर्ते आणि नेते यांच्या बोलावलेल्या बैठकीत त्यांनी त्या पलीकडे जाऊन मोदी सरकारला घेरले. पण त्याच वेळी ते प्रादेशिक पक्षांवर राजकीय आघात करून बसले.
काँग्रेसने 1980 आणि 1990 या दोन दशकांमध्ये दलित समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिले असते, दलितांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना चांगला प्रतिसाद दिला असता, तर देशात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आले नसते आणि ते वाढलेच नसते, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले. याचा अर्थ काँग्रेस आजही जातीनिष्ठ प्रादेशिक पक्षांच्या विरोधात असल्याचे त्यांनी ठळकपणे दाखवून दिले.
– राहुल गांधींच्या वर्तणुकीतली विसंगती
अल्पसंख्यांक नेत्यांची बैठक आणि दलित नेत्यांची बैठक या दोन्ही घडामोडींमधून राहुल गांधींच्या राजकीय वर्तणुकीतली विसंगती समोर आली. एकीकडे त्यांनी मोदी सरकार पडायची भाषा केली, तर दुसरीकडे त्यांनी प्रादेशिक पक्षांना डिवचले. राहुल गांधींनी खरंच मोदी सरकार पाडायचे असते, तर त्यांनी आत्ता प्रादेशिक पक्षांना डिवचण्याचा धोकाच पत्करला नसता. कारण काँग्रेस आज तरी स्वबळावर मोदी सरकारला पाडायच्या परिस्थितीत नाही. काँग्रेसकडे तेवढी ताकदच नाही. प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस असे मिळून सुद्धा आज मोदी सरकारला पाडू शकत नाहीत, अशी अवस्था असताना राहुल गांधींनी प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावरच वैचारिक घाला घालायला नको होता. उलट प्रादेशिक पक्षांना चुचकारून त्यांनी काँग्रेसकडे आकर्षित करायला हवे होते. पण राहुल गांधी प्रादेशिक पक्षांनाच दूर लोटून बसले.
– उत्तर प्रदेशात काँग्रेसची चूक
राहुल गांधींच्या दोन्ही बैठकांमधल्या वक्तव्यांच्या आधीच काँग्रेसने उत्तर प्रदेशात मोठे राजकीय कांड केले. काँग्रेसच्या उत्तर प्रदेश मधल्या नेत्यांनी समाजवादी पार्टीच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात घेतले. त्यामुळे समाजवादी पार्टीचे नेते चिडले आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करायला सुरुवातीपासूनच विरोध केला. त्यामुळे भाजपच्या पराभव करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून बसलेल्या काँग्रेस नेत्यांना समाजवादी नेत्यांनी जोरदार प्रादेशिक धक्का दिला.
Intention to overthrow Modi government; But attack on regional parties; Rahul Gandhi’s twisted political justice!!
महत्वाच्या बातम्या