नाशिक : महाराष्ट्रात अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसला स्वबळाची खुमखुमी आली आहे आणि त्यातून या पक्षांनी आपल्या मित्र पक्षांनाच कोलायची तयारी चालवली आहे. Congress
महाराष्ट्रात पुढच्या चार-पाच महिन्यांमध्ये महापालिका, जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपरिहार्य असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे महायुतीचे घटक पक्ष एकत्रितच निवडणूक लढवतील, असे सांगितले. अगदी एखाद दुसऱ्या ठिकाणी अपवाद म्हणून मित्रपक्ष स्वतंत्र लढू शकतील, असे ते म्हणाले. मित्र पक्षांसाठी फडणवीसांचे वक्तव्य हा “इशारा” ठरला, पण आघाडी किंवा युती मधल्या मित्र पक्षांनाच कोलायच्या जुन्या सवयीप्रमाणे अजितदादांच्या राष्ट्रवादीला “अचानक” स्वबळाची “उबळ” आली. अजितदारांच्या राष्ट्रवादीने विदर्भामध्ये भाजपकडे जास्त जागा मागून स्वबळावर लढायची तयारी चालवली. अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद विदर्भात तोळामासा असताना त्यांच्या पक्षाने भाजपकडे नागपूर महापालिकेच्या 40 जागा मागितल्या, तर गडचिरोली मध्ये धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माझे काम केले नाही म्हणून मी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्याबरोबर निवडणूक लढवणार नाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवेन, असे जाहीर करून टाकले. Congress
– फडणवीसांची एक फटकार राष्ट्रवादी गारेगार
वास्तविक बहुमतासाठी गरज नसताना देखील भाजपने अजितदादांना सत्तेच्या वळचळणीला घेतले. म्हणून अजितदादा उपमुख्यमंत्री आणि त्यांचे आठ-दहा नेते मंत्री बनू शकले, अन्यथा त्यांना विधानसभेत विरोधी बाकांवरच हात बडवत बसावे लागले असते, पण भाजपने स्वतःच्या भविष्यातल्या राजकारणाचा विचार करून अजितदादांना सत्तेवर आणून बसवले, पण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्या सवयीप्रमाणे मित्रपक्षांनाच कोलायची खुमखुमी आली. जसे काँग्रेस – राष्ट्रवादीच्या काळात राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसवर कुरघोडी करायचा प्रयत्न करायचे, तसेच प्रयत्न अजितदादांच्या नेत्यांनी भाजप महायुतीत चालविले. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक भूमिका घेऊन अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीला फटकारणार नाहीत, तोपर्यंत ही स्वबळाची “उबळ” वाढत राहील आणि नंतर ती “शांत” होईल. अन्यथा भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखवेल.
-उत्तर प्रदेशात काँग्रेसचे स्वबळ
दुसरीकडे उत्तर प्रदेशात रसातळाला गेलेल्या काँग्रेसला स्वबळाची खुमखुमी आली. आम्ही काय भिकारी आहोत का??, समाजवादी पक्षाकडे आम्ही जागांची भीक मागणार नाही. आम्ही आमचा पक्ष मजबूत करून उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो, असे काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी जाहीर केले. 2025 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस मजबुतीने उतरेल. आमच्याकडे नेत्यांना तोटा नाही, अशी दर्पोक्ती इम्रान मसूद यांनी केली.
वास्तविक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या संघटनेच्या बळावर काँग्रेसला उत्तर प्रदेशातल्या 10 जागांवर यश मिळाले. काँग्रेस तेव्हा स्वबळावर लढलु असती, तर त्या 10 जागांवरचे देखील डिपॉझिट जप्त झाले असते. पण उत्तर प्रदेशात आपले 10 खासदार निवडून आले म्हणजे आपले संघटनात्मक बळ प्रचंड वाढले, असे काँग्रेसच्या नेत्यांना भासू लागले. म्हणूनच काँग्रेसला एवढी स्वबळाची खुमखुमी चढली. त्यातूनच इम्रान मसूद यांची दर्पोक्ती बाहेर आली. पण समाजवादी पक्षाने काँग्रेसच्या पाठीशी उभे केलेले संघटनात्मक बळ मागे घेतले की, काँग्रेसच्या दंडात शिरलेली स्वबळाची बेटकुळी आपोआप खाली बसून जाईल.