विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिधूडीने फिजूल हुसका दी है मक्खी; उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाला ढकलले I.N.D.I आघाडीत, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. BSP pushed into I.N.D.I alliance in Uttar Pradesh politics
भाजपचे खासदार रमेश बिधूडी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत चांद्रयानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना बहुजन समाज पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली यांना उद्देशून मुल्ला, उग्रवादी, आतंकवादी, कटवा वगैरे अपशब्द वापरले. त्यामुळे दानिश अलींच्या आणि विरोधकांच्या हाती “राजकीय बटेर” लागले असून ते त्याचा पुरेपूर लाभ उठवायच्या मागे लागले आहेत. त्यामुळेच वर उल्लेख केलेली, बिधूडीने फिजूल हुसका दी है मक्खी, अशी चर्चा सुरू झाली आहे.
वास्तविक भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपविला होता. पण दानिश अलींना मात्र तो विषय संपवायचा नव्हता, हेच कालच्या दिवसभराच्या घडामोडीतून स्पष्ट झाले. रमेश बिधूडी यांनी जे अपशब्द वापरले ते आपल्याला सहन झाले नाहीत, त्यामुळे रात्रभर आपण झोपू शकलो नाही, जर रमेश बिधूडींवर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई केली नाही, तर आपण लोकसभेचा त्याग करू. खासदारकीचा राजीनामाही देऊ, असे वक्तव्य करून दानिश अलींनी वादामध्ये तेल ओतले.
हे कमी झाले की काय म्हणून, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल हे दोन काँग्रेसचे वरिष्ठ नेते दानिश अलींच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. राहुल गांधी आणि दानिश अली यांच्या आलिंगनाचा “मोहब्बत की दुकान” हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यामुळेच बिधूडीने फिजून हुसका दी है मख्खी, या वर उल्लेख केलेल्या चर्चेला पुष्टी मिळाली.
वास्तविक दानिश अली ज्या बहुजन समाज पक्षाचे खासदार आहेत, त्या पक्षाने सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए आणि विरोधी “इंडिया” आघाडी यांच्यापासून समान अंतर राखले होते. मायावती पूर्णपणे स्वतंत्र लढण्याच्या मूडमध्ये होत्या. पण आता बहुजन समाज पक्षाला आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसचे नेते उतावळीपणे दानिश अलींच्या घरी पोहोचले.
त्यामुळे केवळ स्वतःच्या तोंडाळपणातून रमेश बिधूडी यांनी स्वतःहून बहुजन समाज पक्षाला विरोधी “इंडिया” आघाडीत ढकलले. त्याचा तोटा भाजपला उत्तर प्रदेशात होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली.
उत्तर प्रदेशातील चौरंगी लढतीत भाजपला फायदा होतो. कारण भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस हे स्वतंत्र लढल्यानंतर मत विभागणीत भाजपचे पारडे जड ठरते, असा गेल्या 4 निवडणुकांचा अनुभव आहे. पण आता तर बहुजन समाज पक्ष काँग्रेसच्या वळचणीला “इंडिया” आघाडीत निघून गेला, तर हे सत्ता समीकरण बिघडू शकते, याची भीती उत्तर प्रदेशातल्या भाजप नेत्यांना वाटते आहे.
भाजपच्या कुठल्या गंभीर राजकीय कृतीमुळे असे घडले असते, तर तो भाग अलहिदा. पण केवळ रमेश बिधूडी यांच्या बेताल वक्तव्यामुळे हे घडले. त्यामुळेच भाजप श्रेष्ठी त्यांच्यावर संतप्त असल्याची बातमी आहे. भाजपने रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीसही काढली आहे. भाजप श्रेष्ठींनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असले तरी विरोधक मात्र आता त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत, हे कालच्या मोहब्बत की दुकान भेटीवरून स्पष्ट झाले.
BSP pushed into I.N.D.I alliance in Uttar Pradesh politics
महत्वाच्या बातम्या
- अरुणाचलच्या 3 खेळाडूंना चीनने नाकारला व्हिसा; क्रीडामंत्री अनुराग ठाकूरांनी दौरा केला रद्द
- लोकसभेत भाजप खासदाराची जीभ घसरली; राजनाथ सिंह यांनी माफी मागितली!!
- मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक यांचा फॉक्स आणि न्यूज कॉर्पचा राजीनामा; 70 वर्षे राहिले अध्यक्ष, मुलाला दिली जबाबदारी
- कॅनडाच्या आरोपांमुळे अमेरिका तणावात, NSA म्हणाली – भारताला या प्रकरणी कोणतीही ‘विशेष सवलत’ देणार नाही