पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यस्थेला नीट गती देता येईल असा प्रतिहल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केला. Pravin Darekar criticizes Sanjay Raut on Maharashtra India Economy
अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी त्यांच्या सामनामधील रोखठोक या सदरामध्ये केले होते. त्याला उत्तर म्हणून दरेकर यांनी राऊतांच्या डोळ्यात अंजन घातले.
मनमोहन सिंगच्या सरकारपेक्षा दीड पटीने अर्थव्यवस्थेचा विकास
प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांनी सामनामध्ये लिहलेल्या रोखठोक या सदरातील मजकुरावर चांगलाच हल्ला चढवला. राऊत यांनी अर्थव्यवस्थेविषयीचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत असे ते म्हणाले.
“मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे स्थिर ठेवण्याचं काम केलं. तसेच लोकांसाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं.अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील दहा वर्षात जी प्रगती करु शकले नाहीत, ती प्रगती मोदींनी दीडपट गतीने गेल्या पाच वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला याचं भान संजय राऊतांना नाही. किंवा ते समजून न उमजल्यासारखं करत आहेत.” असं प्रविण दरेकर म्हणाले. तसेच राऊत केंद्रीय आणि देशपातळीवरचे नेते असल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांना चिंता करावीशी वाटत नाही, असा आरोपसुद्धा दरेकर यांनी राऊतांवर केला.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून मोदींवर हल्ला चढवला. कोरोना महामारीने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशातील 60 टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत, असं सांगतानाच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं होतं.