विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 14 जून रोजी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय रणनीती, संघटनात्मक स्थिती आणि सुरू असलेल्या फोडाफोडीच्या चर्चांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.Uddhav Thackeray
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या खासदारांबाबत सुरू झालेल्या विविध राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः सत्ताधारी शिवसेनेकडून ठाकरे गटातील काही खासदार संपर्कात असल्याचे दावे वारंवार केले जात असल्याने उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेत पक्षातील परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.Uddhav Thackeray
‘ऑपरेशन टायगर’मुळे राजकीय खळबळ
गेल्या काही आठवड्यांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील काही खासदार लवकरच पक्षांतर करतील, असे संकेत दिले जात आहेत. काही नेत्यांनी तर ठाकरे गटातील बहुसंख्य खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने नव्या राजकीय मोहिमेची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत ठाकरे गटातील ९ पैकी ७ खासदार उपस्थित होते, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती.
संजय जाधवांबाबतच्या चर्चांनी वाढवली उत्सुकता
परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. त्यातच त्यांनी काही पक्षीय बैठका टाळल्याची चर्चा असून परभणी जिल्हा संघटनेतही अलीकडे काही बदल करण्यात आले आहेत.
यामुळे 14 जून रोजी होणाऱ्या बैठकीत संजय जाधव उपस्थित राहणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष लागले आहे.
खासदारांच्या भेटींमुळे वाढल्या अटकळी
अलीकडच्या काळात ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटातील नेत्यांच्या भेटी घेतल्यानेही चर्चांना अधिक उधाण आले आहे.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली, तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती.
संबंधित खासदारांनी या भेटी विकासकामे, निधी आणि मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात असल्याचे स्पष्ट केले असले, तरी त्यामागे राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत असल्याची चर्चा कायम आहे.
मातोश्रीवरील बैठकीत काय ठरणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत लोकसभा निवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधान परिषद निवडणुकीचे परिणाम आणि पक्षसंघटना मजबूत करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षातील खासदारांच्या भूमिकेबाबतही उद्धव ठाकरे थेट संवाद साधू शकतात.
राजकीय वर्तुळाचे लक्ष 14 जूनकडे
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली ही बैठक केवळ संघटनात्मक नसून राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीनंतर ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असेल, पक्षातील नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल का आणि शिंदे गटाच्या दाव्यांना काय उत्तर दिले जाईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Operation Tiger Sparks Alert: Uddhav Thackeray Calls Urgent MPs Meeting at Matoshree
महत्वाच्या बातम्या
- RSS : संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??
- Belfast Riots : बेलफास्टमध्ये स्थलांतरितांविरोधी हिंसाचार भडकला; घरे जाळली, पोलिसांवर हल्ले, आयर्लंड-यूकेमध्ये तणाव
- पवारांना म्हणे, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ऑफर की राजकीय पुडी??; पण पवारांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, तेव्हा काय झाले होते??
- NEET : NEET परीक्षेवर संसदीय समितीचे ताशेरे; चीन-अमेरिकेच्या मॉडेलचा अभ्यास करण्याची शिफारस, NTA-NMC ला मोठा सल्ला