विशेष प्रतिनिधी
मुंबई : एखादी व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत पर्यंत पोहोचली म्हणून त्या व्यक्तीची उंची मोठी होत नाही आणि या देशात अनेक जण पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत म्हणून त्यांची उंची कमी होत नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. Sanjay Raut said, no one has become the Prime Minister so his height is not decreasing !!
उत्तर प्रदेशात भाजपला गळती लागली आहे. अशी गळती सत्ताधारी पक्षाला कधी लागत नाही, असा टोला आहे राऊत यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल. भाजपचे 13 आमदार फुटतील, असे राजकीय भाकित शरद पवार यांनी केले होते. त्या भाकिताला संजय राऊत यांनी दुजोरा दिला होता. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राऊतांना आणि पवार यांना टोले लागणारे दोन ट्विट केले होते. शरद पवार पंतप्रधान कधी होणार?, हे संजय राऊत यांनी सांगावे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार?, हे शरद पवारांनी सांगावे अशी ही ट्विट होती.
त्यावर संजय राऊत यांनी आज उत्तर दिले आहे. कोणीही व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत पोहोचली म्हणून त्यांची उंची वाढत नाही. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी ही मोठ्या उंचीची माणसे होती. अनेक मोठ्या व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. पण त्यामुळे त्यांची उंची कमी होत नाही, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. आधी शरद पवार यांची राजकीय सामाजिक कार्यातली उंची गाठा आणि मग बोला. शरद पवार हे सह्याद्री सारखे आहेत. आणि भाजपमध्ये टेकाडे आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या ट्विट पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. ते सर्व विरोधकांच्या ऐक्याचे प्रयत्न करत आहेत, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाची चर्चा रंगलेली असतानाच संजय राऊत यांनी एखादी व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत पोहोचली नाही म्हणून त्या व्यक्तीची उंची कमी होत नाही, असे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. या खेरीज ज्या पद्धतीने नवाब मलिक यांनी शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असे स्पष्ट केले. त्या पद्धतीनेच संजय राऊत यांनी शरद पवार हे आता पंतप्रधान होणार नाहीत याची एक प्रकारे कबुली दिली असल्याचे मानले जात आहे.