विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai Manhole मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निष्काळजी कारभारामुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालिका प्रशासनावर सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत असून, चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे.Mumbai Manhole
मोबाईलवर बोलत असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडले
साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ खासगी कंत्राटदाराकडून मलनिसारण वाहिनीच्या मॅनहोलवर जाळी बसवण्याचे काम सुरू होते. यासाठी 20 ते 25 फूट खोल मॅनहोलचे झाकण उघडण्यात आले होते. मात्र, घटनास्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेड्स किंवा इशारा फलक नव्हते.Mumbai Manhole
भरपावसात मोबाईलवर बोलत चाललेल्या अस्लम शेख यांना पाण्याखाली उघडा मॅनहोल असल्याचे लक्षात आले नाही आणि ते थेट त्यात कोसळले. पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने ते वाहून गेले.
छत्री-चप्पल सापडली, मृतदेह पुढच्या मॅनहोलमध्ये
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला शोधमोहीमेदरम्यान त्यांची छत्री आणि चप्पल सापडली. अखेर काही अंतरावरील दुसऱ्या मॅनहोलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चार अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन
घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट करत चार अधिकाऱ्यांना जागेवरच निलंबित करण्याचे आदेश दिले.
निलंबित करण्यात आलेले अधिकारी:
धनाजी हेर्लेकर – सहायक आयुक्त
दीपक चौघुले – दुय्यम अभियंता
अभिजीत चौघुले – कनिष्ठ अभियंता
उत्तम पाटील – सहायक अभियंता
याशिवाय मृताच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतही पालिका प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
“सुरक्षिततेसाठी जाळी बसवत होतो; पण काम करतानाच निष्काळजीपणा झाला” – अश्विनी भिडे
पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, मुंबईत एकूण 1 लाख 3 हजार 926 मॅनहोल्स आहेत. त्यापैकी 96 हजार 383 मॅनहोल्सवर संरक्षणात्मक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे काही मॅनहोल्सवरील जाळ्या तात्पुरत्या काढाव्या लागल्या होत्या.
एल वॉर्डमध्ये काही दिवसांपूर्वी 75 मॅनहोल्सवर जाळ्या बसवायच्या बाकी होत्या. त्यानंतर कामाचा वेग वाढवण्यात आला आणि केवळ चार मॅनहोल्स शिल्लक राहिले होते. त्यापैकी एका मॅनहोलवर जाळी बसवण्याचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली.
भिडे म्हणाल्या की, ज्या कामामुळे मॅनहोल अधिक सुरक्षित होणार होता, त्याच कामादरम्यान कंत्राटदाराने आवश्यक सुरक्षा उपाय केले नाहीत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी ना बॅरिकेड्स दिसत आहेत, ना ट्रायपॉड, ना इतर सुरक्षाव्यवस्था. केवळ दोन कर्मचारी उभे होते. अशा परिस्थितीत भरपावसात नागरिकांना धोका ओळखणे अशक्य होते.
चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती
ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत आयुक्त भिडे यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्याची घोषणा केली.
या समितीत संबंधित विभागाचे उपायुक्त आणि पायाभूत सुविधा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. समिती कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि संपूर्ण कामकाजाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणार आहे.
Mumbai Manhole Tragedy: 4 BMC Officials Suspended Over Senior Citizen’s Death
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावर काँग्रेसची ताकद वाढेल, की गटबाजी वाढेल??
- वारकऱ्यांच्या सेवेसाठी विकासाला वेग; देहूतील इंद्रायणीच्या घाटाचा कायापालट!!
- Ram Mandir : राममंदिर चोरी- आरोपी अविनाशच्या घरातून 20 लाख रुपये सापडले; 1000 डॉलर्सही जप्त करण्यात आले
- एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची “तहान”; दुसरीकडे भारतातच हल्ले करायचा ISI मॉड्यूलचा पर्दाफाश!!