विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Devendra Fadnavis राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत राज्य माहिती आयोगाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्तांनी 12 जून रोजी जारी करण्यात आलेल्या सुधारित नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.CM Devendra Fadnavis
अण्णा हजारेंच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या बदलांविरोधात अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला. मुख्यमंत्र्यांनी राज्य माहिती आयोगाला पाठवलेल्या पत्रात, “ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेणे उचित ठरणार नाही,” असे स्पष्ट नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या या पत्राची दखल घेत राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी सुधारित नियमांना स्थगिती दिली.CM Devendra Fadnavis
12 जूनची अधिसूचना वादाच्या भोवऱ्यात
राज्य सरकारने 12 जून रोजी माहिती अधिकार कायदा 2005 संदर्भातील सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेत अर्ज शुल्कापासून अपील शुल्कापर्यंत अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले होते.
या बदलांमुळे सामान्य नागरिकांना माहिती मिळवणे अधिक खर्चिक आणि क्लिष्ट होईल, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी केला होता.
अण्णा हजारे यांनीही सरकारवर टीका करत माहिती अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून तो महसूल मिळवण्याचे साधन बनवू नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. काही लोक कायद्याचा गैरवापर करत असले तरी संपूर्ण व्यवस्थेवर आर्थिक बोजा टाकणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
सरकारने बदल पूर्ववत न केल्यास उपोषणाचा होता इशारा
अण्णा हजारे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला होता की, माहिती अधिकार कायद्यातील हे बदल मागे घेतले नाहीत, तर ते पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारतील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याने सरकारने तात्पुरती माघार घेतल्याचे चित्र आहे.
कार्यकर्त्यांकडून निर्णयाचे स्वागत
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सुधारित नियमांना स्थगिती मिळाल्याने माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आता अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याने, माहिती अधिकार कायद्यातील बदलांबाबत सरकार नव्याने विचार करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Maharashtra RTI Rules Put on Hold Following CM Devendra Fadnavis Intervention
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावर काँग्रेसची ताकद वाढेल, की गटबाजी वाढेल??
- वारकऱ्यांच्या सेवेसाठी विकासाला वेग; देहूतील इंद्रायणीच्या घाटाचा कायापालट!!
- Ram Mandir : राममंदिर चोरी- आरोपी अविनाशच्या घरातून 20 लाख रुपये सापडले; 1000 डॉलर्सही जप्त करण्यात आले
- एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची “तहान”; दुसरीकडे भारतातच हल्ले करायचा ISI मॉड्यूलचा पर्दाफाश!!