विशेष प्रतिनिधी
नाशिक : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समतेचे अखंड पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदातीरी अत्यंत भव्य, भावपूर्ण आणि ऐतिहासिक असा अभिवादन सोहळा पार पडला. या प्रसंगी सर्व समाजातील भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले असून, विशेषतः आंबेडकरी जनतेचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पवित्र वातावरणात बुद्ध वंदनेने झाली. महाकारुणिक गौतम बुद्ध यांना वंदन करत गोदावरी अर्चनेचा मंगल प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण परिसर “जय भीम” च्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी एकमुखाने डॉ. आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन अर्पण केले.
याप्रसंगी महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे नवनियुक्त सदस्य माननीय डॉ. रमेश पांडव यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषण झाले. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेत स्पष्ट केले की, संविधान जितके त्यांना प्रिय होते, त्याहून अधिक महत्त्व त्यांनी हिंदू कोड बिलाला दिले होते, कारण त्याद्वारे समाजातील अन्याय दूर करून न्याय प्रस्थापित करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.
डॉ. पांडव यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या ऐतिहासिक चळवळींचा उल्लेख करत, त्या केवळ आंदोलन नव्हत्या, तर समता, स्वाभिमान आणि सामाजिक समरसतेचे जिवंत प्रतीक असल्याचे प्रभावीपणे विशद केले. तसेच त्यांनी बाबासाहेबांचा जलसंपदा, नद्या आणि पर्यावरण यांविषयी असलेला दूरदृष्टीपूर्ण विचार अधोरेखित केला.
कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांच्या हस्ते गोदा पूजन करण्यात आले. विशेष आकर्षण म्हणून बाबासाहेबांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १३५ दीप गोदावरी मातेला अर्पण करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण घाट परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. या सोहळ्याचा उत्कर्षबिंदू म्हणजे तथागतांची महाआरती, जी सर्व गोदासेवकांनी अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न केली.
यावेळी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड, दिनेश पगारे, भाजप ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते राहुल निरभवणे, प्रा. संजय साळवे, समीर देव, विवेक उपासनी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुबक ३ नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी सर्व मान्यवरांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. उपाध्यक्ष नृसिंह कृपादास यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. समितीचे चिटणीस मुकुंद खोचे यांनी सूत्रसंचालन प्रभावीपणे केले, विश्वस्त शिवाजीराव बोंदार्डे यांनी आभार मानले. समरसता मंचाचे क्षेत्र प्रचारक माननीय निलेश गद्रे यांनी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमातून केवळ जयंती उत्सव साजरा झाला नाही, तर समता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा एक सशक्त संदेश संपूर्ण समाजाला देण्यात आला. गोदातीरी झालेला हा सोहळा खऱ्या अर्थाने “समरसतेचा दीपोत्सव” ठरला.
The ocean of faith; An unprecedented crowd gathered at Godatiri for Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrations!!
महत्वाच्या बातम्या
- Bihar Govt : मंत्री म्हणाले- 15 एप्रिलला बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल; मुख्यमंत्री निवासस्थानी जदयूची एक तास बैठक
- डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुण्यात विविध ठिकाणी अभिवादन आणि सामाजिक उपक्रम
- PM ModI : मोदी महिलांना म्हणाले- मी गृहस्थ नाही, पण मला सर्वकाही माहिती; आमच्या योजनांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या
- दीर्घकाळाचे राजकीय स्वप्न साकार; हिंदी पट्ट्यातल्या बिहारच्या मुख्यमंत्री पदावर भाजपचे सम्राट चौधरी!!