विशेष प्रतिनिधी
पुणे : CM Fadnavis पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा जोतिबा फुले यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.CM Fadnavis
महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.CM Fadnavis
मुख्यमंत्री म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या शाळेची उभारणी झाली असून त्यांनी शाळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मंत्री भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून ११ एप्रिल १८२७ ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे.
भिडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा
स्त्रीशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी भिडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देत विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी करण्याचे कार्यही महात्मा फुले यांनीच केले, असे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले हे दूरदृष्टीचे थोर समाजसुधारक
फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतिशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल त्यांनी तयार केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. मुंबई महानगरपालिकेची इमारत, खडकवासला धरण, येरवडा कारागृह आणि कात्रज बोगदा यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असेही ते म्हणाले.
कौशल्य विकासाची एक हजार केंद्रे उभारणार
पुणे जिल्हा परिषदेकडून ‘इंडस्ट्री ४.०’ अंतर्गत १०० शाळांमध्ये १०० अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
CM Fadnavis Inaugurates Jyoti-Savitri School; Calls Women’s Reservation a Tribute to Phule
महत्वाच्या बातम्या
- वारकरी संप्रदायात घुसले होते अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार!!
- ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा; शिक्षणाचा नवा दीपस्तंभ!!
- Elon Musk : व्हॉट्सॲप वाचत आहे तुमचे खासगी मेसेज; मस्क म्हणाले- हे विश्वासार्ह नाही, कोर्टात भरपाईची मागणी
- SpiceJet : स्पाइसजेटमध्ये 20% कर्मचाऱ्यांची कपात होणार; वरिष्ठ अधिकाऱ्यांना जानेवारीपासून पगार मिळालेला नाही