नाशिक : शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!, हेच राजकीय वास्तव बंडखोर खासदारांच्या तथाकथित लेटर बॉम्ब मधून समोर आले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून ६ खासदारांनी बंडखोरी केली. त्यामध्ये मोठे राजकीय नाट्य घडले. मुंबई, दिल्ली, जयपूर इथून सगळी सूत्रे हलवली गेली. संजय राऊतांनी बंडखोर खासदारांना ठोकून काढण्याची दमबाजी सुद्धा केली. पण बंडखोर खासदारांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिल्याने आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भाजपची “महाशक्ती” उभी राहिल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून झालेली दमबाजी हवेत विरली. त्यामुळे बंडखोर खासदारांना काही फरक पडला नाही. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या व्हीपचा आदर केला नाही. बंडखोर खासदारांपैकी कोणीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार कुठले या घटनेवर शिक्कामोर्तब झाले.
– शिवसेनेच्या विलीनीकरणाचा कथित धोका
पण बंडखोर खासदारांनी चार पानांचा एक लेटर बॉम्ब टाकल्यामुळे नेमकी बंडखोरी का झाली त्याची काही कारणे त्यांच्या दृष्टीने बाहेर आली. त्यांनी म्हणे, उद्धव ठाकरेंची शिवसेना भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होईल, याचा धोका ओळखला आणि त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून वेगळा मार्ग पत्करला. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीनीकरणास त्यांचा विरोध होता म्हणून सहा खासदारांनी बंडखोरी केली असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलेय.
– राऊतांनी उखडून काढला होता विलीनीकरणाचा मुद्दा
अर्थात उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा मूळात संजय राऊत यांनी उकरून काढला होता. अर्थात संजय राऊत यांनी कधीही उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल किंवा विलीन करावी अशी सूचना केली नव्हती. त्यांनी फक्त काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या प्रादेशिक पक्षांनी मूळ काँग्रेसमध्ये विलीन व्हावे म्हणजेच ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेश मधील वायएसआर काँग्रेस वगैरे पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे संजय राऊत म्हणाले होते. याचा अर्थ संजय राऊत यांनी कुठेही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल असे सूचित सुद्धा केले नव्हते. कारण कुठलीच शिवसेना ही काँग्रेस मधून उगम पावलेली संघटना नव्हती.
– संजय राऊत बंडखोरांचे “राजकीय गिऱ्हाईक”
पण तरीसुद्धा संजय राऊत यांनी काँग्रेसमध्ये पक्षांच्या विलीनीकरणाचा मुद्दा उकरून काढल्याने ६ बंडखोर खासदारांना बंडखोरी करायचा मोका मिळाला. त्यांनी आपल्या बंडखोरीचे खापर संजय राऊत यांनी उकरून काढलेल्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर फोडले. अर्थात संजय राऊत हे नेहमीच शिवसेनेतल्या बंडखोरांसाठी “राजकीय गिऱ्हाईक” ठरले. संजय राऊत यांनी नेहमी फक्त बडबड केली आणि शिवीगाळ केली. त्यांनी बंडखोरांना ठोकून काढायची भाषा वापरली. पण प्रत्यक्षात ते बंडखोरांना शब्दांच्या पलीकडे ठोकून काढू शकले नाहीत किंवा बंडखोरी उलथून टाकण्यात देखील यशस्वी ठरले नाहीत. त्यांनी त्यांच्या रोजच्या बडबडीने बंडखोरांना बंडखोरीचे कारण सांगण्याचे निमित्त दिले. त्या पलीकडे बंडखोर खासदारांच्या लेटर बॉम्बमधून सुद्धा काही साध्य झाले नाही.