विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अहि – नकुलाचे म्हणजेच साप – मुंगसाचे वैर सुरू असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे आमदार एकवटले त्यांनी विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर केले त्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारचे विशेष आभार मानले आहेत.Ahi-Nakula feud ends over Maratha reservation issue; Thanks to Shinde – Fadnavis from Uddhav Thackeray!!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वैर वाढले असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष फुटीनंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कायदेशीर मुख्यमंत्री नाहीत, अशी टीका करीत होते. पण आज त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभार मानल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विशेष म्हणजे आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करणे टाळल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरे म्हणाले, की मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करुन मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि हे विधेयक मंजूर झाले, याचा अर्थ असा आहे की, कायद्याच्या सर्व निकषांवर हे आरक्षण टिकेल, अशी आशा आहे. तशी आमची सर्वांची प्रार्थना आहे. सभागृहात याबाबत समजून सांगण्याची गरज नव्हती. कारण सभागृहात दोन्ही वेळेला एकमताने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे.
“मी मराठा समाजाला सुद्धा धन्यावद देऊ इच्छितो की, त्यांनी एवढा मोठा लढा दिला आहे. मला सरकारला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुम्ही हा प्रमाणिकपणे प्रयत्न केला. तुमच्या प्रामाणिकपणाबाबत मी आज शंका घेत नाही. पण त्याकरता मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले. मी स्वत: मराठा नेते मनोज जरांगे पाटील जिथे उपोषणाला बसले होते तिथे जालनाला अंतरवली सराटी गावात गेलो होतो. ज्या निर्घृणपणाने, निर्दयीपणाने आंदोलकांवर अत्याचार करण्यात आला होता. डोकी फोडली होती. पण त्याची काही गरज नव्हती. हा विषय शांततेने सोडवता आला असता, असे मत उद्धव ठाकरेंनी मांडले.
मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो
मला राजकारणाबाबत जास्त काही बोलायचं नाही. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण कायद्याच्या सर्व पातळीवर टिकेल. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल, अशी मी आशा बाळगतो. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर याबाबत स्पष्ट होईल. पण तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील तरुणांना कुठे नोकरी मिळणार हे सरकारने सांगितलं तर सोन्याहून पिवळं होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंना मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी टीका करणे टाळले. त्यांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये मी जाऊ इच्छित नाही. मी परत एकदा सांगतो, छगन भुजबळ असतील किंवा आम्ही सगळेजण सांगत होतो की, दुसऱ्याच्या न्याय हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून दिला पाहिजे. तसे आज घडले आहे, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
Ahi-Nakula feud ends over Maratha reservation issue; Thanks to Shinde – Fadnavis from Uddhav Thackeray!!
महत्वाच्या बातम्या
- लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉनची भरदिवसा हत्या, लग्न समारंभात हल्लेखोराने केला गोळीबार
- नवाझ शरीफ यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यास बिलावल यांचा नकार!
- “वायनाडला न जाता अमेठीतून लढून दाखवा…” स्मृती इराणींचे राहुल गांधींना खुले आव्हान
- ‘काँग्रेसने १५ पेक्षा जास्त जागा मागितल्या, तर उत्तर प्रदेशमध्ये…’ ; ‘सपा’चा अल्टिमेटम!