नाशिक : वयाच्या 93 व्या वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे कालवश झाले. महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या इतिहासातले महत्त्वाचे पान उलटले गेले. काँग्रेसच्या आणि शरद पवारांच्या अंतर्गत राजकारणामुळे महाराष्ट्राला कधीही न मिळालेला मुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड गेला.
अनंतराव थोपटे काँग्रेसच्या जुन्या जाणत्या वैभवाच्या काळातले नेते होते. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते. भोरला त्यांनी राजकीय वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी कायमच काँग्रेसशी निष्ठा बाळगली. काँग्रेसच्या राजकीय आयुष्यात अनेक यशाचे आणि अपयशाचे मोठे चढ उतार आले तरीसुद्धा अनंतरावांची काँग्रेसनिष्ठा कधी कमी झाली नाही. त्यांनी कधीही काँग्रेस सोडायचा विचार केला नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातले ग्रामीण रस्ते सुधारणार; ५०० दशलक्ष डॉलर्स आणि राज्य सरकारचा ८७०० कोटींच्या निधीला मंजुरी
– इंदिरा गांधी आणि वसंतदादांशी निष्ठा
अनंतरावांनी स्वतःच्या राजकीय आयुष्यात सुद्धा अनेक वादळे पचविली. ते वसंतदादा पाटलांशी सुद्धा निष्ठावान राहिले. त्याकाळी काँग्रेसमध्ये अनेक गट गट असत. त्यावेळी अनंतराव वसंत दादा पाटील गटाचे खंदे नेते मानले जायचे. इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची जबरदस्त निष्ठा होती. काँग्रेसमध्ये ज्यावेळी फूट पडली, त्यावेळी अनंतरावांनी इंदिरा गांधींची कायमची साथ दिली. त्यामुळे इंदिरा गांधींनी नंतर राजीव गांधींनी सुद्धा अनंतरावांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मंत्रिमंडळांमध्ये काम करायची मोठी संधी उपलब्ध करून दिली.
शरद पवारांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अनेकदा राजकीय वादळी निर्माण केली 1978 मध्ये त्यांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवले पण अनंतराव थोपटे हे वसंतदादांबरोबर कायम राहिले. वास्तविक पवारांच्या राजकीय दृष्ट्या चढत्या काळात त्यांच्याच पुणे जिल्ह्यात राहून काँग्रेसचे राजकारण करणे सोपे नव्हते. पुणे जिल्ह्यातले काँग्रेसचे अनेक नेते शरद पवारांना शरण जाऊन राष्ट्रवादीवासी झाले. पण अनंतरावांच्या मनात कधीच राष्ट्रवादीवासी व्हायचा विचार आला नाही.
– थोपटेंना मुख्यमंत्री पदाची संधी आणि पवारांचा खोडा
1999 मध्ये ज्यावेळी सोनिया गांधींनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली त्यावेळी अनंतराव थोपटे काँग्रेस पक्षाचे सगळ्यात ज्येष्ठ नेते होते. सोनिया गांधींनी अनंतरावांना भोरमध्ये त्यांची पहिली सभा दिली त्याच वेळी अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे भविष्यातले मुख्यमंत्री असतील, याची खूणगाठ अनेक राजकारण्यांनी बांधली त्यापैकी शरद पवार एक होते. त्याच वर्षी शरद पवारांनी काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसच्या मोठ्या संभाव्य यशाला खोडा घातला. त्यामुळे अनंतरावांची मुख्यमंत्री पदाची संधी गेली. अनंतराव थोपटे यांच्यासारखा आपल्याच पुणे जिल्ह्यातला नेता काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर बसविला तर आपली पुणे जिल्ह्यातली सगळी राजकीय सद्दी संपेल, असे शरद पवारांना भीती वाटल्याने त्यांनी अनंतरावांच्या मुख्यमंत्री पदात खोडा घातला. त्यांचा भोर मतदारसंघात पराभव केला.
– पवारांपुढे कधीच शरणागती नाही
पण त्यानंतरही अनंतराव थोपटे यांच्या मनात शरद पवारांना शरण जाण्याची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा शिवली नाही. त्यांनी काँग्रेस सोडली नाही. देशातल्या राजकारणाने आणि स्थानिक राजकारणाने सुद्धा असंख्य वळणे आणि वळसे घेतले पण अनंतरावांची काँग्रेसनिष्ठा कधीच कमी झाली नाही. वयोमानापरत्वे अनंतराव दैनंदिन राजकारणापासून निवृत्त झाले, पण ते राजगड साखर कारखाना आणि राजगड शिक्षण संस्था यांचा कारभार ते पाहत राहिले.
– शरद पवारांना जावे लागले अनंतरावांच्या घरी
2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना निवडणुकीत धोका उत्पन्न झाल्याबरोबर त्यांना मदत मिळावी, यासाठी शरद पवारांनी भोर मध्ये जाऊन अनंतराव थोपटे यांचा उंबरठा झिजवला होता. शरद पवारांनी ज्या अनंतरावांच्या मुख्यमंत्रीपदा खोडा घातला, त्याच अनंतरावांच्या घरी जाऊन सुप्रिया सुळे यांना मदत करा, अशी विनंती शरद पवारांना करावी लागली.
आज अनंतराव थोपटे कालवश झाले. महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या राजकीय वैभवाच्या काळातले एक महत्त्वाचे पान उलटले गेले. महाराष्ट्राने कधीही न मिळालेले मुख्यमंत्री गमावले.
Anantrao Thopte: The Chief Minister who did not allow Maharashtra to benefit!!