‘ ती ‘ राहते तो भाग म्हण आजही दुर्गम. त्या गावात अजूनही मोबाईलला रेंज नाही. तरीही ‘ ती ‘ जगभरात ट्रेंड करते …राहीबाई नावाने गुगलवर सर्च करून आता ‘ ती ‘च्या वर रिसर्च होतायत… नथीचा नखरा ट्रेंड झाला मात्र खरा नथीचा गावरान ठसका बघायचा असेल तर भेटा ‘ती’ ला…. Womens Day Special Seed Mother rahibai popare
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : मातीच्या घरावर काही पत्रं टाकून त्यांनी आपली बॅंक उभी केली. या बॅंकेत पैसे ठेवलेले नाहीत पण त्याहून अधिक अमूल्य असं काही जे पैसे देऊनही मिळणार नाही.. ‘ गावरान बियाणं ‘ म्हणूनच तर राहीबाई ‘सीड मदर’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा ‘सीड मदर’ असा उल्लेख केल्याने त्या सातासमुद्रापार माहित झाल्या.
देशी वाणांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना केंद्र सरकारने 2020 मध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित केलं …त्यापूर्वी २०१८ मध्ये महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारीशक्ती पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. तर बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला .
हायब्रीडच्या जमण्यात आज सगळेच देशी आणि अस्सल गोष्टींना मुकलो आहे. अहमदनगच्या एका लहानशा गावातून येणाऱ्या राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी हीच गोष्ट हेरून पुन्हा एकदा जुनं सोनं शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. हा छोटासा प्रयत्नाचा पुढे मोठा वटवृक्ष झाला आणि अनेक पिकांच्या देशी वानाचं संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना आज देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला.
पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. BAIF या संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात बियाणे बँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय.
राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात. राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात.
कशी आहे राहीबाईंची बॅंक?
आत गेल्यावर राहीबाई आपल्याला उत्साहाने त्या बियाण्यांबद्दल माहिती देतात. हे सफेद वांगं आहे, हे गावठी हिरवं वांगं आहे, ही सफेद तूर आहे अशी कित्येक नावं त्या एकामागून एक घेत राहतात. आपण ज्या भाज्यांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या भाज्यांचं वाण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे.
राहीबाई सांगतात आपण जे खातो त्यानेच आपलं शरीर बनतं आणि मनही बनतं. शरीर सदृढ असेल तर मनही सदृढ राहील असा त्यांचा विश्वास आहे.
गावात आजारी लोकांचं प्रमाण त्यांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की आधी बाळ कधी कुपोषित दिसत नव्हते. पण आता जी बालकं जन्माला येत आहेत त्यांचं वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार केला.
हायब्रीड किंवा संकरित वाणांमुळे तर आपली रोग प्रतिकारक क्षमता तर कमी होत नाही ना असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधली.
आजकालच्या भाज्या आणि पीक हे रासायनिक खतावर येतात पण देशी बियाणं मात्र नुसत्या हवेवर आणि पाण्यावर येऊ शकतं असं त्या सांगतात. पण हायब्रीड बियाणांना रासायनिक खतांशिवाय येतच नाही असं त्यांचं निरीक्षण आहे.
‘जुनं ते सोनं’
नाचणी, वरई, राळा आणि जुन्या वाणाचे भात आता वापरातच नाहीत याची खंत त्यांना वाटते. आपल्या घराशेजारील बागेतच त्यांनी चारशे ते पाचशे झाडे लावली आहेत. कुठलंही औपचारिक शिक्षण न झालेल्या राहीबाई बियाण्यांबद्दल भरभरून बोलतात. मला माझ्या वडिलांची शिकवण लक्षात आली. ते म्हणायचे जुनं ते सोनं. त्यानुसारच मी वागत गेले असं त्या सांगतात.
आज राहीबाईंना वेगवेगळे मानसन्मान मिळत आहेत. त्यांचं कौतुक होत आहे पण सुरुवातीला मी जेव्हा हे काम हाती घेतलं तेव्हा लोक मला वेड्यात काढायचे. मी काय काम करायचे हेच बहुतेकांना कळत नव्हतं. हळुहळू लोकांना मी दिलेल्या बियाणांचं महत्त्व पटलं.
त्यानंतर माझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मला बोलवलं जाऊ लागलं. जर लोकांची बोलणी ऐकून हे काम मी सोडून दिलं असतं तर आज जे देशी बियाणं इथं दिसतंय ते तुम्हाला दिसलं नसतं असं त्या सांगतात.
बाजारात पैसे देऊन विष विकत घेण्यापेक्षा, घरासमोर परसबाग करून सेंद्रिय भाजीपाला पिकवा. आता जवळपास तीन हजार महिलांना सोबत घेऊन देशी बियाणे संवर्धनाचे काम सुरु केल्याचे त्या सांगतात. आदिवासी समाजातील राहीबाई निरक्षर आहेत, पण निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या.