वृत्तसंस्था
कोलकाता : आसाममधील मातबर नेत्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी धक्कादायकरित्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसजनांच्या राजीनामा मागे घेण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष करून तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. त्यांनी ममतांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या तृणमूळ काँग्रेस प्रवेशाच्या वेळी राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन उपस्थित होते. अभिषेक बॅनर्जी यांनी सुष्मिता देव यांचे स्वागत केले आहे. त्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यांचा तोलामोलाचा सन्मानच केला जाईल, असे अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. Sushmita Dev, who resigned from Congress today, joins TMC in the presence of party leaders Abhishek Banerjee and Derek O’Brien.
काँग्रेसने महिला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद देऊनही आसाम काँग्रेसच्या संघटनेत महत्त्वाचे पद दिले नाही किंवा आसामच्या राजकारणात पुरेसे महत्त्व दिले नाही, म्हणून त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच त्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसला जाऊन मिळतील, अशीही चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे.
ममता बॅनर्जी यांनी सध्या तृणमूळ काँग्रेसच्या विस्ताराची मोहीम सुरू केली आहे. त्यांनी आसाम, त्रिपूरा या राज्यांवर संघटना विस्तारासाठी लक्ष घातले आहे. त्रिपूरात बंगालमधून नेते आणि कार्यकर्ते पाठवून तिथले ब्लिपव देव सरकार उखडण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे.
तसेच आसाममध्ये तृणमूळ काँग्रेसचा संघटनात्मक विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. सुष्मिता देव यांच्यासारख्या तडफदार नेत्याचा ममतांना आपल्या पक्षाच्या विस्तारात मोठा उपयोग होऊ शकतो. सुष्मिता देव यांना त्या तृणमूळ काँग्रेसमध्ये मोठे पद देऊ शकतात. यातूनच देव यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ममतांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
सुष्मिता देव या आसामचे मोठे नेते संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. संतोष मोहन देव हे राजीव गांधींचे निकटवर्ती नेते होते. आसाम काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा होता. सिल्चरमधून ते निवडून येत असत. त्यांनी केंद्रात बरीच वर्षे मंत्रीपद भूषविले होते. संतोष मोहन देव यांच्यानंतर सुष्मिता देव यांनी त्यांचा राजकीय वारसा संभाळला. त्या सिल्चरमधून २०१४ मध्ये लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. यापुढे त्यांची राजकीय वाटचाल तृणमूळ काँग्रेसमधून सुरू राहील.