विशेष प्रतिनिधी
बीड : बीडसह मराठवाड्यात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांनी पिकांचा विमा उतरण्यास सुरुवात केली. परंतु विमा कंपन्या फक्त लुटत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून विम्याबाबत अजूनही शेतकरी संभ्रमात आहेत. Insurance companies only rob farmers; Allegation of farmers in Marathwada
गतवर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांचा विमा उतरविला होता. मात्र नुकसान झाल्यापासून बहात्तर तासांच्या आत ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या वेबसाईटवर नुकसानीचे फोटो अपलोड केले. अशाच शेतकऱ्यांना विमा लाभ प्राप्त झाला. विमा कंपनीच्या जाचक नियम व अटीमुळे यावर्षी बरेच शेतकरी विमा भरण्याकडे पाठ फिरवत आहेत. विमा कंपनी फक्त शेतकऱ्यांना लुटत असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे विम्याबाबत शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पीक विम्याच्या संदर्भात कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे म्हणाले , कृषी विभाग हा शेतकरी आणि विमा कंपनी यांच्या मधील मध्यस्त आहे. विमा देणे, न देणे हा त्या संबंधित कंपनीचा अधिकार आहे. आम्ही अडचणी निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यास कटिबद्ध आहोत.