विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी येत्या १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ रोजी मतमोजणी होणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजप यांच्यात रस्सीखेच पहायला मिळणार आहे. भाजपकडून या निवडणूकीसाठी औरंगाबाद भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे.AURANGABAD: BJP’s candidature for Sanjay Kenekar confirmed for Legislative Council!
संजय केनेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव महाराष्ट्र भाजपतर्फे निश्चित करून शिफारस केली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित होणार आहे. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत १६ नोव्हेंबर असून केंद्रीय समितीकडून नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
विधान परिषदेच्या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूरचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे. आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक आणि त्यात शिवसेनेशी थेट होणारी लढत पाहता भाजपने डाॅ. भागवत कराड यांच्यानंतर संजय केणेकर यांना बळ देण्याचे ठरवले आहे.
संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड-दोन वर्षात भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार व जिल्ह्यातील शिवसेनेच्या विरोधात आक्रमक आंदोलनी केली आहेत.