विशेष प्रतिनिधी
नागपूर : गुढीपाढव्याच्या दिवशी कोरोनावर विजय मिळवायचा संकल्प करू या, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जनतेशी संवाद साधताना केले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एकवीस दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
ते म्हणाले, संपूर्ण जग या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर आपल्याला सरकारच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नका. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवा. आपली जबाबदारी पार पाडा आणि सामाजिक जबादारीचे पालन करा, असे आवाहन भागवत यांनी या वेळी केले.
लॉकडाऊन व सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करून संघाचं कार्य सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी स्वयंसेवकांना दिल्या. त्याचवेळी देशावर सध्या ओढवलेल्या करोनाच्या संकटावरही भाष्य केलं. ‘करोनाचं संकट मोठं आहे यात वाद नाही. मात्र, समाजाच्या सामूहिक जबाबदारीतून या संकटावर यशस्वीरित्या मात करता येऊ शकते. औषधं व आरोग्याच्या इतर सोयीसुविधा या गोष्टी नंतरच्या आहेत. त्या सहाय्यक आहेत. मात्र, या विषाणू युद्धात लढताना पहिली आणि महत्त्वाची गरज आहे ती संसर्ग टाळण्याची. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हीच या लढाईतील प्रमुख बाब आहे. ती समाजानं पाळावी,’ असं भागवत म्हणाले.