चीनी व्हायरसचे संकट हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने निष्क्रियता सोडून धडाडीने व ठाम निर्णय घ्यावेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसचे संकट हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने निष्क्रियता सोडून धडाडीने व ठाम निर्णय घ्यावेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चीनी व्हायरसचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविकास आघाडीने निष्क्रियता सोडून प्रभावी उपाययोजना करावी तसेच शेतकरी, रोजंदारी कामगार आणि बारा बलुतेदारांसाठी पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी राज्यात सर्व जिल्ह्यांत सरकारला निवेदन सादर केले. राज्य सरकारला जाग आली नाही आणि सरकारने धडाडीने निर्णय घेतले नाहीत तर भाजपा महाराष्ट्र बचाव आंदोलन तीव्र करेल, असा इशारा पाटील यांनी दिला.
आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे सामान्यांचे गंभीर आर्थिक नुकसान झाले आहे. कर्नाटकसह इतर अनेक राज्यांनी ज्या प्रमाणे स्वत:च्या तिजोरीतून सामान्यांसाठी पॅकेज जाहीर केले तसे पॅकेज जाहीर करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.
पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शुक्रवार, दि. २२ रोजी राज्यभर पक्षाचे लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर फलक घेऊन निदर्शने करतील. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असून राज्यातील विशेषत: मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.