विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेक इन इंडिया ही नुसती घोषणा न राहाता ती प्रत्यक्षात यावी यासाठी भारतीय सैन्य दले पुढे सरसावत आहेत. सैन्य दलांचे प्रमुख जन. बिपिन रावत यांनीच तसे सूचित केले आहे.
भारतीय सैन्य दले प्रामुख्याने परकीय अत्याधुनिक शस्त्रांवर अबलंबून आहेत. भारताचे परकीय शस्त्रे आयातीचे प्रमाण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण भविष्यात परकीय शस्त्रास्त्रांवरचे अबलंबित्व कमी करून भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे वापरण्यावर भर द्यावा लागेल, असे जन. रावत यांनी स्पष्ट केले आहे.
याचा अर्थ भारतीय सैन्य दले देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी तडजोड करतील असे अजिबात नाही. उलट भारतीय खासगी उद्योग क्षेत्राशी सहयोग करून आपल्याला गरजेनुसार अत्याधुनिक शस्त्र प्रणाली विकसित करता येईल. आजच्या घडीला भारतीय सैन्य दलांच्या वापरासाठी जागतिक दर्जाच्या तंत्रानुसार ७०% जरी शस्त्रे तयार करता आली तरी भारतीय उद्योग क्षेत्राचे ते मोठे यश ठरेल. सैन्य दले ती दररोजच्या ऑपरेशन्ससाठी वापरू शकतील आणि नजीकच्या भविष्यात देशातच शस्त्र तंत्रात आधुनिकता आणता येईल, असा विश्वास जन. रावत यांनी व्यक्त केला आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे. भारतीय सैन्य दले याच दिशेने पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत.
भारतीय सैन्य दलांची गरजेची शस्त्रे भारतातच तयार झाली तर आयातीचे मोठे बिल वाचेल तेच भारतीय उद्योग क्षेत्रातील प्रगत तंत्रशोधासाठी वापरता येईल आणि भारतीय सैन्य दलांच्या गरजेनुसार अत्याधुनिक शस्त्र प्रणाली विकसितही करता येईल, याकडे जन. रावत यांनी लक्ष वेधले.