विनायक ढेरे
खासदार रमा देवी यांची ओळख देशाच्या राजकारणात एक दबंग नेता म्हणून झाली ती त्यांनी समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांना माफी मागणे भाग पाडल्याबद्दल. तोपर्यंत रमादेवी यांची राजकीय ओळख नव्हती असे नाही, परंतु ती एक प्रकारे बिहार पुरती मर्यादित होती. MP Rama Devi Domineering leader in Bihari politics
त्यांचा राजकीय प्रवास 1990 सालच्या उत्तरार्धात सुरू झाला तो बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून. त्या आणि त्यांचे पती कै. इंजीनियर ब्रिज बिहारी प्रसाद हे जनता परिवाराच्या दीर्घकाळ हिस्सा राहिले होते. रमादेवी या कायद्याच्या पदवीधर आहेत. सध्या लोकसभेच्या सभापती तालिकेवर त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे. कारण संसदेतला त्यांचा अनुभव दीर्घकाळ राहिला आहे.
2009 मध्ये राष्ट्रीय जनता दलातून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि भाजपच्या राजकीय संस्कृती त्या मिसळून गेल्या. राष्ट्रीय जनता दलाच्या सर्वच नेत्यांची राजकीय प्रतिमा ही दबंग नेता म्हणून आहे. तशीच त्यांची देखील प्रतिमा दबंग नेता अशीच राहिली आहे. बिहारच्या हिंसक राजकारणात इंजीनियरिंग ब्रिज बिहारी प्रसाद यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर मुजफ्फरपूरमधून आपले राजकीय स्थान स्वतःच्या बळावर मजबूत केले. संसदेत आज त्या शिवहर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये त्यांचा मतदारसंघ अव्वल आहे. वैयक्तिक पातळीवर त्यांनी लक्ष घालून केंद्र सरकारच्या जनधन योजनेपासून प्रधानमंत्री आवास योजना, जन आरोग्य योजना यांचे लाभ लाखो नागरिकांना मिळवून दिले आहेत.
आझम खान यांच्या सारखा उत्तर प्रदेशातला दबंग नेता जेव्हा संसदीय परंपरांचा आणि सर्वसामान्य संकेतही उल्लंघन करत होता त्यावेळी रमादेवी यांनी कणखर भूमिका घेऊन संसदेत त्यांना माफी मागणे भाग पाडले. एकीकडे देश महिलांच्या प्रगतीसाठी महिला केंद्रित कायदे करत असताना पुरुष केंद्रित आणि पुरुषी अहंकारी राजकारण चालविणाऱ्या आजम खान यांच्यासारख्या नेत्याला त्यांनी संसदेत धडा शिकवला. यामुळे रमादेवी देशपातळीवर चर्चेत आल्या.
आपल्या विधिमंडळ आणि संसदीय कार्य करीत त्यांनी महिला आणि बालकल्याण या विषयांमध्ये विशेष कार्य केले. गर्भवती महिलांना विशेष भत्ता देण्यासंदर्भात सन 1998 पासून त्यांनी आग्रह धरला. बिहार मध्ये त्याची पहिली अंमलबजावणी त्यांनी कॅबिनेट मंत्री असताना केली. त्यांच्याकडे त्यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि महिला विकास हे खाते होते.
राष्ट्रीय जनता दलातून भाजप मध्ये आल्यानंतर देखील महिलांचे हक्क या विषयाचा आग्रह त्यांनी सोडला नाही. तो अधिक तीव्र केला. संसदेत देखील त्यांनी गर्भवती महिलांच्या विशेष अधिकारासाठी कायदा करण्याचा आग्रह धरला. यातून गर्भवती महिलांच्या पोषणा संदर्भातला कायदा अस्तित्वात येऊ शकला. संसदेतल्या महिला आणि बालकल्याण समितीच्या त्या पंधरा वर्षांपासून अधिक काळ सदस्य राहिल्या आहेत. त्यांनी सुचविलेल्या विविध तरतुदी आणि दुरुस्त्या यांचा समावेश महिलाविषयक कायद्यांमध्ये अनेकदा करण्यात आला आहे.