प्रतिनिधी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट राजकीय नव्हती, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले असले, तरी त्यातले राजकारण बाहेर आल्याशिवाय राहिले नाही. कारण ज्या ११ विषयांसाठी ठाकरे – पवार – चव्हाणांनी पंतप्रधानांची भेट घेतली, त्या विषयांमध्ये ठाकरे – पवार सरकारने विधान परिषदेवरच्या १२ आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नाचाही समावेश केला होता. thackery – pawar govt brought in politics in PM meeting by demanding 12 MLA appointment in legislative council
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधानांसमवेत झालेल्या चर्चेची माहिती देताना ओघात हा विषय सांगितला. ते म्हणाले, की महाविकास आघाडीने नियमाप्रमाणे १२ जणांची यादी राज्यपालांना सोपविली आहे. याता ८ महिने उलटून गेले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे बहुमताचे सरकार आहे. राज्याच्या कॅबिनेटने आमदारांच्या नियुक्तीचा ठराव केला आहे. पण राज्यपालांनी त्याला अद्याप मंजूरी दिलेली नाही.
आम्ही पंतप्रधानांना विनंती केली, की त्यांनी राज्यपालांना याबाबत कार्यवाही करण्याची सूचना करावी आणि १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा, असे अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
-मुख्यमंत्र्यांची आमदारकीही पंतप्रधानांकडूनच भेट
या पूर्वीही विधान परिषदेच्या निवडणूकीचा विषय महाविकास आघाडीच्या नेत्यांना पंतप्रधान मोदींच्या दारात न्यावा लागला होता. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीचा विषय राजकीय आणि घटनात्मक पेचप्रसंगाचा बनला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना स्वतःच पंतप्रधानांना त्यासाठी विनंती करावी लागली होती.
आता १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी देखील महाविकास आघाडीतील नेत्यांना पंतप्रधानांना विनंती करावी लागली आहे. एक प्रकारे महाविकास आघाडीतले नेते आपल्या सरकारच्या वैधतेवर पंतप्रधानांकडून शिक्कामोर्तब करवून घेण्याच्या प्रयत्नांत असल्याचे यातून दिसते आहे. पंतप्रधानांच्या भेटीत राजकारणाचा विषय नव्हता असे ठाकरे – पवार जरी सांगत असले, तरी १२ आमदारांच्या नियुक्तीचा विषय भेटीच्या अजेंड्यात टाकून त्यांनी राजकारण साधायचाच प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.