वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालमधले नेते मुकूल रॉय यांनी भारतीय जनता पक्षातून तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने केंद्र सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. Security of TMC leader Mukul Roy has been withdrawn by Ministry of Home Affairs (MHA), order has been issued: Govt Sources
पण मुकूल रॉय यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था का… केव्हा… आणि कशी… काढली याची राजकीय कहाणी मोठी रोचक आहे. मुकूल रॉय हे मूळचे काँग्रेसचे नेते. त्यांनी तृणमूळ काँग्रेसमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. त्यावेळी ते बंगालमध्ये सुरक्षित फिरत होते. त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. अनेकदा तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरण्याचा, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
बंगालमधले भाजप नेते मुकूल रॉय घरवापसीच्या तयारीत; तृणमूळच्या वाटेवर
त्यामुळे त्यांना केंद्रीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी आणि २०२१ च्या विधानसभेच्या वेळी मुकूल रॉय हे भाजपचे नेते म्हणून केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेच्या घेऱ्यात संपूर्ण बंगालभर वावरले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेला तृणमूळ काँग्रेसकडून धोका होता.
काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सुरक्षेतला धोका कमी झाला. त्यांनी स्वतः केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून आपली केंद्रीय सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची मागणी केली. बंगालमध्ये आपल्या सुरक्षिततेला धोका नाही, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार आता मुकूल रॉय यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे.