कोरोनाच्या संकटात माणुसकीचे दर्शन घडत आहे. राजस्थानातील पाच युवकही कोरोना रुग्णांसाठी देवदूतासारखे धावून आले आहेत. आपल्या मोटारीलाच त्यांनी अॅम्ब्युलन्स बनविले असून गरजूंना ऑक्सिजन देत आहेत.Five youth converted car intoambulances, delivering oxygen to the needy
विशेष प्रतिनिधी
जयपूर : कोरोनाच्या संकटात माणुसकीचे दर्शन घडत आहे. राजस्थानातील पाच युवकही कोरोना रुग्णांसाठी देवदूतासारखे धावून आले आहेत. आपल्या मोटारीलाच त्यांनी अॅम्ब्युलन्स बनविले असून गरजूंना ऑक्सिजन देत आहेत.
कोटातील विज्ञाननगरमधील चंद्रेश गेहिजा यांचे गॅरेज आहे. साई मित्र मंडळातील त्यांचे मित्र आशीष सिंह, भरत समनानी, रवि कुमार आणि आशु कुमार हे त्यांचे मित्र. कोरोनाच्या संकटात सध्या देशात सर्वत्रच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि बेडचीही कमतरता भासत आहेत.
त्यामुळे या पाच मित्रांनी आपल्या तीन गाड्यांचे रुपांतर अॅम्ब्युलन्समध्ये केले. कोटा येथील साई चौकात त्यांच्या या गाड्या उभ्या असतात. कोणीही गरजू आले की त्यांना तातडीने मदत करतात.
सध्या सर्वात जास्त कमतरता ऑक्सिजनची आहे. त्यामुळे चंद्रेश यांनी मोटारींमध्ये ऑक्सिजन सेटअप बनविले. त्यासाठी अकराशे रुपयांचे रेग्युलेटर त्यांनी साडेतीन हजार रुपयांना खरेदी केले. त्याचबरोबर ऑक्सिजन मास्क घेण्यासाठी त्यांना जास्त पैसे द्यावे लागले.
ही सगळी तयारी झाल्यावर त्यांनी लोकांना सेवा द्यायला सुरूवात केली. ज्या रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही, ऑक्सिजनची व्यवस्था नाही त्यांना मदत करणे सुरू केले. रुग्णांना त्यांच्या गरजेप्रमाणे ते ऑक्सिजन पुरवितात.
जोपर्यंत रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात जागा मिळत नाही तोपर्यंत त्याला मोटारीपर्यंत ठेवले जाते. त्याचबरोबर अनेक वेळा गंभीर रुग्णांना घरापासून रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे कामही चंद्रेश आणि त्यांचे सहकारी करतात.
चंद्रेश यांनी सांगितले की आता आम्ही तीन मोटारींचे अॅम्ब्युलन्समध्ये रुपांतर केले आहे. त्यातील एक मोटार त्यांची स्वत:ची तर दुसºया भावाची आणि चुलत्याची आहे. गरज पडल्यास आणखी मोटारी मिळविण्याचा प्रयत्न आहे.
मोटारीत रुग्णाला ऑक्सिजन चालू ठेवायचा असल्यास एसीही चालू ठेवावा लागतो. त्यामुळे खर्च वाढतो. ऑक्सिजन आणि इतर खर्चासाठी दररोज पाच ते सात हजार रुपये लागतात. हा खर्च सगळे मित्र मिळून करतात.
पदरमोड करून रुग्णांना ऑक्सिजन देणे सोपे नाही. त्यासाठी रात्रभर जागावे लागते. सायंकाळी सात वाजता रांगेत उभे राहिल्यावर रात्री दीड-दोन वाजता ऑक्सिजनचे तीन सिलेंडर मिळतात. तेच पुरवावे लागतात.
अनेकदा गरजुंचे फोन येतात. परंतु, ऑक्सिजन नसल्यास काहीच करता येत नाही.काही रुग्णांसाठी तर हे मित्र मोफत ऑक्सिजन पोहोचवितात. कधी कधी तीन-चार मजले चढून सिलेंडर घेऊन जावा लागतो. परंतु, माणसुकीच्या भावनेतून पाचही मित्रांचे काम चालूच आहे.