विशेष प्रतिनिधी
शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल अनुकूल लागूनही काँग्रेस हायकमांडला ते पचलेले दिसत नाहीत. काँग्रेस हायकमांडने हिमाचल प्रदेशात वीरभद्र सिंह यांचा वारसा नाकारून त्यांच्या विरोधात राजकारण केलेल्या सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली आहे, तर मुख्यमंत्रीपदाचे दुसरे स्पर्धक मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्री केले आहे. Congress High command rejected veerbhadra singh legacy in himachal pradesh, trapped in as in andhra pradesh
मात्र कै. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष खासदार प्रतिभा सिंह आणि त्यांचे पुत्र आमदार विक्रमादित्यसिंह यांचे सर्व दावे हायकमांडने फेटाळून लावले आहेत. काँग्रेस हायकमांडच्या निर्णयावर प्रतिभा सिंह तीव्र नाराज झाल्या असून त्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हजर तर राहिल्या, पण सुखविंदर सिंह सुक्खू यांची मुख्यमंत्री पदाची घोषणा होताना त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपून राहिली नाही. ती स्पष्ट दिसली. इतकेच नाही तर बैठकीतून बाहेर आल्यानंतर काँग्रेस हायकमांडचा निर्णय आम्ही स्वीकारतो एवढेच बोलून त्या निघून गेल्या.
मात्र, काँग्रेस पक्षाचे निरीक्षक राजीव शुक्ला आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी हिमाचल मधल्या 40 काँग्रेस आमदारांनी एकमताने सुखविंदर सिंग सुक्खू यांची मुख्यमंत्रीपदी आणि मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्री पदी निवड केल्याचे सांगितले आहे. उद्या रविवारी सकाळी 11.00 वाजता होणाऱ्या शपथविधीला प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हिमाचल प्रदेशातल्या या सगळ्या नाट्यमय घडामोडीत कै. वीरभद्र सिंह यांच्या परिवाराकडून काँग्रेसने सत्ता खेचून घेतल्याच्या बातम्या येत आहेत. कै. वीरभद्र सिंह यांचा परिवार अनेक वर्षे काँग्रेस मधून सत्तेवर राहिला. स्वतः वीरभद्र पाच वेळा मुख्यमंत्री होते. प्रतिभा सिंह या खासदार आणि आमदार आणि आता त्यांचा पुत्र विक्रमादित्य सिंह आमदार म्हणून कार्यरत आहेत. प्रतिभा सिंह या सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. काँग्रेस हायकमांडने वीरभद्र सिंह यांचा राजकीय वारसा मान्य करावा, अशी मागणी त्यांनी जाहीररीत्या केली होती. मात्र काँग्रेस हायकमांडने त्यांचे म्हणणे स्वीकारले नाही. त्यांच्या ऐवजी सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली.
आंध्रचे रिपीटेशन हिमाचलात
2010 च्या दशकात अशीच घटना अखंड आंध्र प्रदेशात घडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर राजशेखर रेड्डी यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने तेथे त्यावेळचे विधानसभेचे सभापती अध्यक्ष किरण कुमार रेड्डी यांना मुख्यमंत्री केले. पण राजशेखर रेड्डी यांचे पुत्र वायएसआर जगन मोहन रेड्डी यांना डावलले. परिणामी जगन मोहन रेड्डी यांनी सुरुवातीला काँग्रेस अंतर्गत संघर्ष करून पाहिला. पण नंतर काँग्रेस बाहेर पडून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपद मिळवले. आज आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी दोन तृतीयांश बहुमतासह वायएसआर काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत, तर मुख्य काँग्रेस पक्ष तिथे अस्तित्वातही उरलेला नाही.
वीरभद्रांचा वारसा नाकारला
हिमाचल प्रदेशात कै. वीरभद्र सिंह यांची राजकारणावर प्रचंड पकड होती. 2022 च्या निवडणुकीत त्यांच्याच नावावर काँग्रेसने मते मागितली होती. काँग्रेसला तेथे 40 आमदार निवडून आणता आले. मात्र त्यानंतर काँग्रेस हायकमांडने वीरभद्र सिंह यांच्या वारसाकडे दुर्लक्ष केले. प्रतिभा सिंह अथवा विक्रमादित्य सिंह यांना मुख्यमंत्री न करता ते मुख्यमंत्रीपद सुखविंदर सिंग सुक्खू यांना दिले आहे.
बंडखोरीचा पवित्रा?
याचा अर्थ वीरभद्र सिंहांचा परिवार आता राजशेखर रेड्डी यांच्या परिवारासारखाच बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे राजकीय निरीक्षक मानत आहेत. प्रतिभा सिंह यांची नाराजी उघड दिसली आहे. सुखविंदर सिंग सुक्खू उद्या जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यावेळी प्रतिभा सिंह आणि त्यांचे समर्थक नेमके काय करतील?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर उद्याचा शपथविधी जरी काँग्रेस हायकमांडच्या इच्छेनुसार सुखरूप पार पडला, तरी नजीकच्या भविष्यकाळात प्रतिभा सिंह आणि त्यांचे समर्थक आमदार कोणती भूमिका घेतील?, याकडे लक्ष राजकीय वर्तुळाचे लागले आहे. भाजपचे नेते काँग्रेस अंतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
Congress High command rejected veerbhadra singh legacy in himachal pradesh, trapped in as in andhra pradesh
महत्वाच्या बातम्या
- बाजारातले बैल ते साहित्यिकांनी वातावरण बदलावे; शिवसेनेचा एक राजकीय प्रवास
- हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांचे नाव पुढे येताच काँग्रेस हायकमांड विरुद्ध प्रतिभा सिंह समर्थकांची नारेबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे – फडणवीस सरकारची २०० कोटींची मदत
- जैश ए मोहम्मदचा दहशतवादी कमांडर आशिक अहमद नेंगरूचे घर प्रशासनाकडून उध्वस्त