वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरीच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अटक केल्यानंतर राज्याचे राजकारण त्यांच्याभोवती फिरते की काय?, अशी भीती वाटल्याने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातल्या भाजप सरकार विरोधात रान पेटवण्यासाठी राज्यभर रथयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाचे लाखो कार्यकर्ते या रथयात्रेत सहभागी होतील, असे त्यांनी जाहीर केले आहे. Akhilesh Yadav upset as Priyanka Gandhi is coming to the center; Went on a rath yatra in Uttar Pradesh !!
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने 11 नेते आणि कार्यकर्त्यांसह अटक केली आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलन करायला सुरुवात केली आहे. पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते प्रियांका गांधी यांच्या बाजूने राजकीय मैदानात हिरीरीने उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रियांका गांधी उत्तर प्रदेशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आल्याचे चित्र निर्माण होत आहे. तसे चित्र निर्माण झाले तर राज्यातल्या भाजप सरकारला ते प्रतिकूल ठरेलच, परंतु विरोधी पक्ष म्हणून समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांना ते अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेशच्या राजकारणात भाजप पहिल्या नंबरचा पक्ष असला तरी त्याखालोखाल समाजवादी पक्षाचे दुसरे स्थान मजबूत आहे त्यानंतर बहुजन समाज पक्षाचा नंबर लागतो. काँग्रेस पक्ष सध्या चौथ्या स्थानावर आहे. जर काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाचा निमित्ताने आघाडी घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची राजकीय हानी भाजपपेक्षा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनाच सोसावी लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच अखिलेश यादव अस्वस्थ झाले आहेत.
भाजपशी स्पर्धा करताना मध्येच काँग्रेसचा अडथळा तयार व्हायला नको यासाठी त्यांनी समाजवादी पक्षाच्या रथयात्रेची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना हे सरकार उलथवून लावण्याचे यांनी आवाहन केले आहे.
लखीमपूर मधील व्हिडिओ, फोटो हेच दर्शवतात की भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार केले आहेत. या सरकारला आता राज्यावर राहण्याचा अधिकार नाही. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन भाजप सरकार विरोधात रान पेटवतील, असे अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी हे पदावर असताना राज्याचे पोलीस त्यांच्या घरात शिरून कशी काय कारवाई करू शकतील? त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि समाज राज्य सरकारने विद्यमान न्यायाधीशामार्फत लखीमपूरच्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
अखिलेश यादव यांनी भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध जोरदार तोफा डागल्या असल्या तरी त्यांच्या समाजवादी पक्षाच्या रथयात्रेचे राजकीय टार्गेट मात्र प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.