विशेष प्रतिनिधी
कोलकता : पश्चिम बंगालमधील निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून हिंसाचार वाढेल, अशी शक्यता राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत होत असून सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.West Bengal ready for sixth phase voting
पश्चिम बंगालमध्ये तीन टप्प्यातील मतदान होणे बाकी असून निवडणूक आयोग कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक खबरदारी घेत आहे. आतापर्यंत हिंसाचाराची बहुतांश प्रकरणे तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांत झाली आहेत.
गुरुवारी होणाऱ्या सहाव्या टप्प्यांत चार जिल्ह्यात ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यांतील लोकसभेच्या जागा भाजपच्या ताब्यात आहेत तर बहुतांश ठिकाणी तृणमूलचे आमदार आहेत. त्यामुळे सहाव्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
येत्या २२ एप्रिलला उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील सर्व ९ जागा, नदिया जिल्ह्यातील १७ पैकी ९ जागा, उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील ३३ पैकी १७ जागा आणि वर्धमान जिल्ह्यातील २४ पैकी ८ जागांवर मतदान होणार आहे.
या जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील लोकसभेच्या तीन जागा दार्जिलिंग, रायगंज आणि बालुरघाट यांचा समावेश होतो. तिन्ही ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. तर ९ विधानसभेपैकी सहा ठिकाणी तृणमूल तर उर्वरित तीन ठिकाणी माकप, फॉरवर्ड ब्लॉक आणि कॉंग्रेस यांचा प्रत्येकी एक आमदार आहे.