वृत्तसंस्था
कुचबिहार – पश्चिम बंगालमध्ये कुचबिहारच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल जगदीप धनकर यांच्या गाड्यांचा ताफा दिनहाटामध्ये जमावाने अडवून त्यांच्याशी वाद घातला. राज्यात मी ज्या भागात दौऱ्यावर आलो आहे, तेथे कायद्याचे राज्यच अस्तित्वात नाही. जंगल राज आहे, असे टीकास्त्र राज्यपालांनी सोडले आहे. West Bengal A group of people block the path of Governor Jagdeep Dhankhar’s car and raise slogans in Dinhata, Cooch Behar
राज्यात निवडणूक निकालांनंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला त्याची पाहणी करण्यासाठी राज्यपाल कुचबिहार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी – महिलांशी चर्चा केली. दिनहाटामध्ये एका जमावाने घोषणाबाजी करीत त्यांचा ताफा अडविला. राज्यपालांनी गाडीतून उतरून त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमावाने त्यांच्याशी वाद घातला.
यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यपालांनी बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की लोकांना गुंडांनी घरे सोडायला भाग पाडले आहे. मला काही महिलांनी सांगितले की गुंड इथे पुन्हा येऊन त्रास देतील त्याच्या भीतीने आम्हाला घरे सोडावी लागतील. लोकांच्या मनात पोलीसांबद्दल देखील भीती आणि अविश्वास आहे.
गुंडांनी लोकांची घरे लुटली आहेत पण लोक पोलीसात जाऊन तक्रार करायला घाबरत आहेत. हे लोकशाही उध्दवस्त झाल्याचे लक्षण आहे. इथे राज्यपालांसमोर सुरक्षेची एवढी पायमल्ली होते आहे, तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल, याचा विचारही अंगावर शहारे आणतो, अशा शब्दांत राज्यपालांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर टिपण्णी केली.
तत्पूर्वी, राज्यपालांनी सीतलाकुची येथे जाऊन नागरिकांची भेट घेतली. इथे निवडणूकीत आणि निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या नागरिकांचे राज्यपालांनी सांत्वन केले.