वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातून भाजपसाठी गळतीच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आली आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देऊन ते समाजवादी पक्षात प्रवेश करणार असले तरी भाजपची गळती आज तरी थांबली आहे. उलट भाजपमध्ये काँग्रेसच्या दोन विद्यमान आमदारांची आणि समाजवादी पक्षाच्या एका माजी आमदारांची भरती झाली आहे. Two congress MLAs and one former Samajwadi Party MLA joined BJP in U. P.
सहारनपुर जिल्ह्यातील बेहत मतदार संघाचे काँग्रेस आमदार नरेश सैनी आणि फिरोजाबाद जिल्ह्यातील सिरसागंज मतदार संघाचे काँग्रेस आमदार ओम पाल यादव यांनी दिल्लीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे दोन विद्यमान आमदार भाजपने फोडल्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेस आमदारांची संख्या आणखी घटली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे माजी आमदार डॉ. धरम पाल सिंह यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य हे मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाचा मला अजिबात फोन आलेला नाही. छोट्या किंवा मोठ्या नेत्याने मला फोन करून मला वळवण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि आता त्याचा उपयोग काही नाही. त्यांनी आधीच काही लोकांच्या उपयोगाची कामे केली असती तर माझ्यासारख्या व्यक्तीने भाजप सोडला नसता, असे वक्तव्य स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.