भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशात द्वेष पसरवण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले की, भाजप आणि आरएसएसच्या द्वेषाची किंमत प्रत्येक भारतीय चुकवत आहे. जातीय हिंसाचारावर सोनिया गांधींनी एका वृत्तपत्रासाठी लिहिलेला लेखही राहुल यांनी शेअर केला.Rahul Gandhi shared Sonia’s article, accusing BJP-Sangha of playing politics to spread hatred in the country
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशात द्वेष पसरवण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले की, भाजप आणि आरएसएसच्या द्वेषाची किंमत प्रत्येक भारतीय चुकवत आहे. जातीय हिंसाचारावर सोनिया गांधींनी एका वृत्तपत्रासाठी लिहिलेला लेखही राहुल यांनी शेअर केला. दुसरीकडे, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यासह 13 नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे.
भाजप-आरएसएसच्या द्वेषाची किंमत प्रत्येक भारतीय चुकवत आहे, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. भारताची खरी संस्कृती ही सामायिक उत्सव, समुदाय आणि एकता आहे. ती जपण्याचा संकल्प करूया, असेही ते म्हणाले.
सोनिया गांधींच्या लेखात जातीय हिंसाचारावर भाष्य
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लेखात ‘नव्या व्हायरस’बद्दल लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, आज आपल्या देशात द्वेष, कट्टरता, असहिष्णुता आणि असत्य पसरले आहे. आता हे थांबवले नाही तर येणाऱ्या काळात एवढे नुकसान होईल की ते भरून काढता येणार नाही.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला
ज्यांच्या बोलण्याने समाजात फूट पडते अशा लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर सूचना का देत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी लिहिले की, आम्ही देशात द्वेष पसरवण्याची परवानगी देऊ शकत नाही आणि इतरांनीही देऊ नये.
त्या म्हणाल्या की, खोट्या राष्ट्रवादाच्या वेदीवर शांतता आणि बहुलवादाचा बळी दिला जात आहे आणि एक समाज म्हणून आपण ते शांतपणे पाहू शकत नाही. द्वेषाच्या सुनामीवर मात करूया. राहुल यांनी केंद्रावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही राहुल गांधी आणि सोनिया गांधी भाजप देशात द्वेष पसरवण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता.