वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेगासस हेरगिरीपासून कृषी कायद्यंपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर संसदेमध्ये गोंधळ घालून कामकाज बंद पाडून सर्व विरोधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतर वर पोहोचले.Opposition leaders join farmers at Jantar Mantar, Delhi in their protest against farm laws.
तिथे कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकजुटीने जंतर-मंतर वर जाण्याचा निर्णय आज घेतला होता. त्यानुसार संसदेत गोंधळ घालून हे खासदार जंतर मंतरवर पोहोचले खरे, परंतु त्यांच्यामध्ये तृणमूल काँग्रेस खासदार, बसपा आणि आम आदमी पक्षाचे खासदार नव्हते. या तिन्ही पक्षांनी राहुल गांधी यांचे नेतृत्व मागण्यास नकार दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
जंतर-मंतरवर धरण्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अम्बिका सोनी, शिवसेनेकडून संजय राऊत, द्रमुकचे टी. आर. बालू आदी नेते सहभागी झाले आहेत. परंतु ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी यांनी या आंदोलनात जाण्याचे टाळले. यातून विरोधी एकजुटीला त्यांनी तडा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.